Site icon

धुळे : महाराष्ट्र राज्य किसान सभेचे केंद्रसरकारविरोधात आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा 
केंद्रसरकारने विदेशी कापडाच्या आयात शुल्कावर सूट दिल्याने भारतातील कापसाचे दर कमी होणार आहे. परिणामी कापूस उत्पादकांना मोठे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कापसाच्या आयात शुल्कावरील सूट तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने धुळ्यात धरणे आंदोलन करण्यात आले.
शहरातील जेलरोडवर येथे झालेल्या आंदोलनात किसान सभेचे हिरालाल परदेशी, वसंतराव पाटील ,किशोर सूर्यवंशी ,संतोष पाटील, पोपटराव चौधरी ,साहेबराव पाटील ,हिरालाल सापे, मदन परदेशी ,नाना पाटील ,रामचंद्र पावरा, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी केंद्रशासना विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र शासनाच्या निर्णयामुळे भारतातील कापसाचे दर निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवरील हा अन्याय असून केंद्र शासनाने तातडीने विदेशी कापडाच्या आयात शुल्काला दिलेली सूट रद्द करावी. शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. असमानी संकटामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करू नये, अशी टीका यावेळी करण्यात आली. नुकसान भरपाई द्यावी, खरीप पिकांची 2022 मधील 25 टक्के अग्रीम रक्कम पिकविमा रक्कम तत्काळ देण्यात यावी, परदेशी सोयाबीन आयातीवर निर्बंध घालावा, भूसंपादन कायदा 2013 च्या अंमलबजावणी करावी, खरीप हंगामाचे अतिवृष्टीमुळे थकीत कर्ज वसुली थांबवावी, शेतकऱ्यांचे वीजबिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित करू नये, कापसाला नऊ हजार पाचशे रुपये हमीभाव देण्यात यावा अशी आदी मागण्या आंदोलनप्रसंगी मांडण्यात आल्या.

हेही वाचा:

The post धुळे : महाराष्ट्र राज्य किसान सभेचे केंद्रसरकारविरोधात आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version