
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शेतकरी उत्पादक कंपन्यांसह अधिकारी आणि व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कांदा खरेदीत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये कांदा खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी मान्य केल्याने आता या गैरप्रकाराची सखोल चौकशी होईपर्यंत नााफेडची कांदा खरेदी बंद करण्यात यावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.
याबाबत माहिती देताना कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील काही नाफेड खरेदी केंद्रावर नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी अचानकपणे भेटी दिल्यानंतर तेथे होत असलेला गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. या पार्श्वभूमीवर नाशिकसह महाराष्ट्रातील नाफेड व एनसीसीएफसाठी कांदा खरेदी करणाऱ्या सर्व खरेदी केंद्रावरील पुढील संपूर्ण कांदा खरेदी केंद्र सरकारने पूर्णपणे बंद ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या धाडसत्रामध्ये नाफेडसाठी अधिकृत विकत कांद्यापेक्षा दुप्पट कांदा गोडाऊनमध्ये आढळून आला आहे. पाच ते सहा खरेदी केंद्रावर चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे समोर आले. आधार कार्डवर शिक्के मारून ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारात गडबड केली गेली. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने यापूर्वीच नाफेड व एनसीसीएफच्या कार्यालयामध्ये जाऊन लेखी पत्राद्वारे तसेच ईमेल करून संपूर्ण कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने करावी. तसेच बफरस्टॉकसाठीच्या कांदा खरेदीत शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळावा यासाठी नाफेड एनसीसीएफने थेट राज्यातील बाजार समित्यांमधून लिलाव प्रक्रियेतून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा, अशी मागणी केली होती. आता जोपर्यंत नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीतील बोगसगिरीची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत नाफेड एनसीसीएफसाठी बफर स्टॉकचा कांदा खरेदी करणाऱ्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कांदा खरेदीचे काम केंद्र सरकारने तत्काळ बंद करावी, अशी मागणी भारत दिघोळे यांनी केली आहे.
हेही वाचा: