Site icon

नाशिक : इंदिरानगरला जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा 

इंदिरानगर परिसरातील काही कॉलनी भागात पाण्याची समस्या असल्याने टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असताना दुसरीकडे मात्र इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक ३० मधील वैभव कॉलनीजवळील चड्डा पार्क परिसरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

रविवारी (दि.21) सकाळी ७ वाजता लाखो लिटर पाणी रस्त्याने लेखानगर ते गोविंदनगरपर्यंत वाहत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पाण्याची गळती थांबवून नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा द्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे यांनी दिला. गेल्या अनेक दिवसांपासून राजीवनगर, राणेनगर, चेतनानगर, सदिच्छानगर, इंदिरानगर परिसरात लोकांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी गॅस पाइपलाइन खोदल्यामुळे ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या पाण्याची गळती परिसरात नजरेस पडते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, ही गळती थांबवण्याची मागणी शिवसेना विभागप्रमुख रवींद्र गामणे, विभाग संघटक किरण शिंदे, उपविभागप्रमुख आकाश काळे, सागर देशमुख, आकाश कदम, शाखाप्रमुख साईनाथ घुले, रवि अर्धापुरे, गणेश पांजगे, मोहन हिवाळे, करण साळवे, दिनेश थोरात आदींनी केली आहे. 

शिवसेनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सातत्याने उठवला जात आहे रविवारी सकाळी सात वाजेपासून पाणी रस्त्यावर वाहते तरी अधिकारी मस्त आपल्या आयुष्य आरामात जगत आहेत त्यांचा दैनंदिन कार्य चालू आहे पण नागरिकांकडे त्यांना बघायला वेळ नाही अधिकाऱ्यांच्या निष्क्रियते मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार आहे – निलेश साळुंखे शिवसेना उपमहानगर प्रमुख.

हेही वाचा:

The post नाशिक : इंदिरानगरला जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया appeared first on पुढारी.

Exit mobile version