
नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘चला जाणू या नदीला’ या अभियानात गोदावरी नदीला वगळल्याने संतप्त झालेल्या गोदाप्रेमींनी गोदावरीनदीकाठी रामकुंडावर गुरुवारी (दि.३) आत्मक्लेश आंदोलन केले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील संपूर्ण 75 नद्या व उपनद्यांचे जल अमृत व्हावे, यासाठी ‘चला जाणूया नदीला’ या अभियानांतर्गत नदीयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु दर बारा वर्षांनी कुंभमेळा होणाऱ्या गोदावरी या पवित्र नदीचा समावेश या यादीमध्ये केलेला नाही. याबाबत सातत्याने प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही अद्यापही या शासन व प्रशासनाने गोदावरी नदीचा समावेश त्यांच्या शासन आदेशामध्ये केलेला नाही. ही मोठी अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून, यासाठी शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व साधूमहंत, पुरोहित संघ, सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व पर्यावरणप्रेमी यांनी शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत गोदाघाटावरील रामकुंडावर आत्मक्लेश आंदोलन केले.
यासाठी नाशिकमधील साधू, महंत, पुरोहित संघ, नाशिककर व सर्व पर्यावरणप्रेमी यांनी पवित्र अशा रामकुंड या ठिकाणी आत्मक्लेश करण्यात आले. यात महंत भक्तीचरदास महाराज, महंत राजाराम महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, आयोजक निशिकांत पगारे, राजू देसले, एनजीओ फोरमचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू शिरसाठ, नंदिनी नदीचे प्रा. सोमनाथ मुठाळ, वरूणा नदीचे सुनील परदेशी, राहुल जोरे , वीरेंद्र टिळे, रोहित कानडे, आळंदी नदीचे तुषार पिंगळे, प्रभाकर वायचळे, सुरेश भोर, डॉ. अजय कापडणीस, योगेश कापसे, जगबिर सिंग, सुरेंद्र बोरसे, वैशाली चव्हाण, भारती जाधव व मंगला पिसे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी पंचवटी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत चौकशी करून सोडून देण्यात आले.
पवित्र गोदावरी नदीचा ‘चला जाणू या नदीला’ या अभियानात समावेश व्हावा, यासाठी सातत्याने प्रशासनासोबत पाठपुरावा करूनही शासन, प्रशासन दखल घेत नसेल तर नदी यात्रेसाठी उपनद्यांना जे कलश देण्यात आलेले आहेत ते सर्व कलश लवकरच शासनाला परत केले जाईल.
– निशिकांत पगारे, गोदावरी नदी संवर्धन समिती, नाशिक
हेही वाचा :
- श्रीगोंदा : ऊसतोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांना गंडा
- पुणे : परिनिरीक्षण मंडळाच्या नियुक्ती प्रक्रियेत बदल
- रोजगार मेळावा : एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा संकल्प, पुढील आठवड्यात १८ हजार ५०० पोलिस पदांची भरती
The post नाशिक : 'चला जाणू या नदीला’ या अभियानातून गोदावरीला वगळल्याने गोदाप्रेमींचे आंदोलन appeared first on पुढारी.