नाशिक : कोविड प्रादुर्भावाच्या काळात लहान मुलांची वैद्यकीय काळजी, सामाजिक सुरक्षा आणि १८ वर्षांखालील मुलांची मानसिकता स्थिर राहण्यासाठी नाशिक जिल्हा हा देशातील आघाडीचा जिल्हा ठरला आहे. त्यामुळे ‘चाइल्ड फ्रेंडली’ नाशिक जिल्ह्याचे प्रयत्न इतर जिल्ह्यांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याची माहिती राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य डॉ. आर. जी. आनंद यांनी दिली.
देशात अनुकरणीय काम
डॉ. आनंद म्हणाले, की कोविड काळात १८ वर्षांखालील मुलांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगले प्रयत्न केले. एक हजार मृत्यूत कोविडमुळे जिल्ह्यात अवघे दोन मृत्यू झाले. जिल्हा ‘चाइल्ड फ्रेंडली’ करण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणांनी एकत्र येऊन आरोग्य, शिक्षण, मानसिक व शारीरिक पोषणासाठी अधिक व्यापक प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी विविध उपाययोजना राबविताना चाइल्ड लाइन संस्थेकडे येणाऱ्या बालविवाह, बालमजुरी, शोषण, मारहाणीच्या तक्रारी सोडविण्यासाठी एकत्रित उपाययोजना होतील. दर महिन्याला मासिक अहवाल घेतला जावा, अशा सूचनाही डॉ. आनंद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या आढावा बैठकीनंतर डॉ. आनंद बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रसाद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. पाटील, सहाय्यक कामगार आयुक्त सुजित शिर्के, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा एस. डी. बेलगावकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची
नवा टोल फ्री नंबर
राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगामार्फत ‘संवेदना’ या उपक्रमांतर्गत १८००१२१२८३० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला असून, या क्रमांकावर प्रादेशिक भाषांमध्ये मुलांच्या समुपदेशनाची सोय केली आहे.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ग्रामीण भागात मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी चाइल्ड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच बालकांमधील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत एक मूठ पोषण आहार अभियानाची माहिती दिली. तर अधीक्षक सचिन पाटील यांनी पोलिसांच्या उपक्रमांची माहिती दिली.
हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच
बालमृत्यू दर हजारी प्रमाण
देशात ३९
राज्यात १९
नाशिक १०