Site icon

नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी मूळ पुुरुष रावणाचे दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करताना दहन करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी शुक्रवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आदिवासी समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात रावण दहन आयोजित करणार्‍या संस्था, संघटना, राजकीय पक्ष, कार्यकर्ते व आयोजकांवर फौजदारी कारवाई करावी. रावणदहन प्रथा कायमची बंद करताना आदिवासी समाजाला जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या नेत्यांना त्वरित अटक करावी. आदिवासी महिला व मुलींवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना आदिवासी विभागातील रिक्त जागा त्वरित भराव्यात आदी मागण्या यावेळी निवेदनात करण्यात आल्या.

निमाणीतील आरपी विद्यालय येथून मोर्चाला प्रारंभ झाला. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, नेहरू गार्डन, शालिमार, सीबीएसमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, हर हर महादेव फाउंडेशन, आदिवासी संघर्ष समिती, रावण युवा फाउंडेशन, आदिवासी शक्ती सेना, एकलव्य भिल्ल समाज संघटना, आदिवासी उलगुलान सेना, सह्याद्रीचा राजा वीर राघोजी युवा फाउंडेशन, उलगुलान कामगार संघटना, कोकणा समाज संघटना, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, आदिवासी वारली बहुउद्देशीय संस्था, धर्मपुत्र आदिवासी भिल्ल समाज फाउंडेशन आणि आदिवासी आदिम सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी appeared first on पुढारी.

Exit mobile version