Site icon

नाशिक : 40 हजार आयुष्मान भारत गोल्डन कार्डची नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन 2011 च्या सामाजिक आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून आयुष्मान भारत योजनेसाठी जिल्ह्यातून 16 लाख 7 हजार 144 लाभार्थी पात्र ठरले आहेत. दि. 23 सप्टेंबर 2018 पासून आजपर्यंत सरासरी 5 लाख 30 हजार लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे ई-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढलेले आहे. या योजनेमार्फत 1,209 आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. जिल्ह्यात 30 दिवसांत 40 हजार कार्डांची नोंदणी झाली आहे.

या योजनेत कोविडमुळे दोन वर्षे लाभार्थ्यांचा सहभाग कमी होता. तो वाढण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष मोहीम सुरू आहे. उर्वरित सरासरी 11 लाख व्यक्तींचे गोल्डन कार्ड काढणे बाकी आहे. आपले सरकार केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय येथे हे कार्ड यापुढेही काढून मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालयातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये लाभार्थ्यांनी नजीकच्या आपले सरकार केंद्र किंवा ग्रामपंचायत केंद्रात मोफत स्वरूपात गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन मित्तल यांनी केले आहे. कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेले आयुष्मान भारतचे पत्र, रेशनकार्ड किंवा आधारकार्ड ही कागदपत्रे घेऊन जवळच्या ग्रामपंचायतीत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे. स्वतःच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणार्‍या व्यक्तीस द्यावा म्हणजेच ई-कार्ड त्वरित तयार होऊन आपल्याला उपलब्ध होईल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. कोणत्याही ग्रामपंचायत किंवा आपले सरकार सेवा केंद्राकडून जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध आजारांवर उपचार व शस्त्रक्रियांसाठी जिल्ह्यातील 63 सरकारी व खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. आयुष्मान भारत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय संरक्षण मिळते. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये 996 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे वैद्यकीय संरक्षण मिळते. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी दोन लाख 50 हजार रुपयांची तरतूद आहे.

10 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक वाटप…
आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी नामनिर्देशन केलेल्या 10 लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या कार्डचे महत्त्व सांगत, योजनेतील समाविष्ट रुग्णालयात उपचार घ्यावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, भास्कर कनोज यांच्या हस्ते कार्डांचे वितरण करण्यात आले.

हेही वाचा:

The post नाशिक : 40 हजार आयुष्मान भारत गोल्डन कार्डची नोंदणी appeared first on पुढारी.

Exit mobile version