Site icon

वाटा विकासाच्या : गावाने उचलले महिला सक्षमीकरणासाठी पाऊल

नाशिक : वैभव कातकाडे
थेरगावने सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत दारिद्य्ररेषेखालील मुलींचे बचत खाते ग्रामपंचायतीच्या 15 टक्के निधीतून उघडले आहे. महिला सक्षमीकरणासाठी उचललेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल तालुक्यात गावाचे नाव उंचावते.

गावाने गावातील मुलांच्या भविष्याचा विचार करता लोकसहभागातून अभ्यासिका उभारली आहे. स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, असे या वाचनालयाचे नाव असून, लोकवर्गणीमधून या ठिकाणी पुस्तके मागवली जातात. कोणाचा वाढदिवस असल्यास त्याच्याकडून अभ्यासिकेसाठी पुस्तकांची मागणी केली जाते आणि ग्रामस्थही या शाश्वत कार्यासाठी आनंदाने मदत करतात. गावात रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वी झाला आहे. शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर आदी ठिकाणांहून वाहून जाणारे पाणी साठविण्यात येत आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना हेच पाणी दिले जाते. ग्रामस्थांनी मिळून बंधार्‍यातील गाळ काढत वनराई बंधाराही बांधला आहे. गावातील महिला बचत गट तसेच महिला ग्रामस्थ मिळून महिन्यातून एक दिवस गावाची साफसफाई करतात. गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणीपुरवठा केल्याने गेल्या पाच वर्षांत दूषित पाण्यामुळे होणारे आजार प्रतिबंधित झाले आहेत. एकही साथीचा आजार उद्भवला नसल्याने राज्य शासनाने चंदेरी कार्ड देऊन गावाला सन्मानित केले आहे. कोरोना विषाणूमुळे गावाला सुरुवातीला संसर्ग झाला होता. मात्र, शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांमुळे गाव कोरोनामुक्त राहिले. तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड, गावचे सरपंच दत्तू बोराडे आणि ग्रामसेवक प्रवीण भवरे हे गावची धुरा सक्षमपणे सांभाळत आहे.

घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी केलेली सोय.

लोकवर्गणीमधून संकलित करण्यात आलेले स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय.

उत्कृष्ट कामाचा नमुना असलेली स्मशानभूमी.

आयएसओ अन् साईनाथ
पर्यावरणपूरक कामे करताना गावाने सर्व घरांना एलईडीचे महत्त्व सांगितल्याने गावात प्रत्येक घरात एलईडी वापरली जाते. गावातील स्मशानभूमी ही उत्कृष्ट कामाचा एक नमुनाच आहे. गावाने अल्पावधीतच आयएसओ मानांकन मिळाले हे आणखी एक वैशिष्ट्य होय. गावातील साईनाथ नामक व्यक्ती रोज न चुकता तीनचाकी सायकल घेऊन गावभर फिरतो आणि गावातील 200 घरांचा कचरा गोळा करून शोषखड्ड्यात टाकतो. त्याचवेळी चुकून गावात आलेले प्लास्टिक गोळा करून तेदेखील गावाने उभारलेल्या प्लास्टिक केंद्रात जमा केले जाते. हा साईनाथ खर्‍या अर्थाने गावातील स्वच्छतेची चळवळ समर्थपणे पुढे नेत आहे.

हेही वाचा:

The post वाटा विकासाच्या : गावाने उचलले महिला सक्षमीकरणासाठी पाऊल appeared first on पुढारी.

Exit mobile version