आ. छगन भुजबळ : दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही

रानवड साखर कारखाना www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, महाराष्ट्र कमकुवत होणार नाही. दिल्लीला आधार देण्याचे काम महाराष्ट्र करतो, हे कुणीही विसरू नये, अशी टीका करीत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही. दिवस येतात आणि दिवस जातात. जरा धीर धरा, आपले दिवस परत येतील, असा सबुरीचा सल्ला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना दिला.

रानवड येथे स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा चाळीसावा गळीत हंगामाचा प्रारंभ छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आ. सुहास कांदे, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, श्रीराम शेटे, मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, के. के. वाघ संस्थेचे अजिंक्य वाघ, माणिकराव बोरस्ते, तानाजीराव बनकर, नानासाहेब बोरस्ते, चांगदेवराव होळकर, सुरेशबाबा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, देशात आणि राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असून, त्यांना दिलासा देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जिल्हाधिकार्‍यांना नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना काय अडचणी आहेत, याची विचारपूस करण्याची गरज आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच पक्षभेद असले, तरी शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. निवडणुका आल्यावर आपापले झेंडे काढू. मात्र, विकासाच्या कामासाठी एक होऊन काम करू या, असे आवाहन त्यांनी केले. भुजबळ म्हणाले की, निफाडमधील कारखाने सुरू करण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून, शरद पवार आणि अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे रानवड कारखाना सुरू झाला. या कारखान्याचे खर्‍या अर्थाने चीज बनकर यांनी केले आहे. तसेच आता निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी दिलीप बनकर प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांना सर्वांनी पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी हितासाठी कारखाने सुरू होणे आवश्यक असून, शेतकर्‍यांनी संयमाची भूमिका ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

तसेच नाशिकमधूनच सगळे पाणी पुढे मराठवाड्याकडे जाते, तरीदेखील नाशिकचे कारखाने बंद पडले आणि मराठवाडा परिसरातील कारखाने मात्र सुरू राहिले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, एअरबस प्रकल्पाचे काम जेव्हा टाटा यांना मिळाले, त्यावेळी सर्वात प्रथम टाटा यांना पत्र लिहून नाशिकच्या एचएएलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ, हा प्रकल्प नाशिकला द्यावा, अशी विनंती केली होती. मात्र हा प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर गेला आहे. त्याबद्दल अतिशय दु:ख असून, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जागेवर ‘ड्रायपोर्ट’ उभारणार, असे गेल्या काही वर्षांपासून केवळ आपण ऐकत आलो आहे. तेही आता गुजरातला गेले, तर आश्चर्य वाटायला नको, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. भुजबळ म्हणाले की, समाजकारण, राजकारणात काही लोक पुढे होऊन काम करत असतात. त्यांना सुरक्षा पुरवली जात असते. अशा वेळी सुरक्षा काढणे योग्य नाही. याचा पुनर्विचार शासनाने करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार दिलीप बनकर यांनी प्रास्ताविक केले.

रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या टप्प्यावर…
भुजबळ म्हणाले की, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द होण्याच्या टप्प्यावर आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने 20 टक्के वाटा उचलण्यास मंजुरी दिली होती. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या भागीदारीतून महारेल या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला. त्यांना वेगवेगळ्या मंजुर्‍यांसाठी 5 वर्षांचा कालावधी गेला. इतके दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित

हेही वाचा:

The post आ. छगन भुजबळ : दिल्लीपुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही appeared first on पुढारी.