जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती, हजारो तरुणांना रोजगार

जळगावची चटई,www.pudhari.news

जळगाव : चेतन चौधरी 
केळी आणि सोन्यासाठी प्रसिध्द असलेल्या जळगावचे नाव आता जगभर चटई उद्योगाच्या माध्यमातूनही होत आहे. जळगावच्या चटईने सातासमुद्रापार आपली कीर्ती पसरवली असून तंत्रज्ञानात स्वावलंबन मिळवत समस्यांवर मात केली आहे. पर्यावरणपूरक असलेल्या या व्यवसायातून हजारो जणांना रोजगार मिळाला आहे. जळगावतील चटई उद्योगातून दरवर्षाला कमीत कमी १०० कोटी रूपयांची वार्षिक उलाढाल होत आहे.

जळगावात १९८७ सुप्रीमने चटई उद्योगाची मुहूर्तमेढ केली. त्यानंतर वर्षभरातच १२० कंपन्यांपर्यंत या उद्योगाने मजल मारली. आजच्या घडीला एकट्या जळगावात दीडशेवर चटई फॅक्टरी कार्यरत आहेत. जगात एकमेव जळगाव असे ठिकाण आहे, जेथे एवढे चटई युनिट सुरु आहेत. असे असले तरी शासनसाच्या दुर्लक्षामुळे या उद्योगाला अजूनही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत, यामुळे उद्योजकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे.

Maharashtra political crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राजकारणात राज्यपालांचा हस्तक्षेप दुर्दैवी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

अशी बनते चटई…

प्लॅस्टिक अथवा टाकाऊ वस्तूंपासून चटई बनविली जाते. त्यासाठी देशभरातून दीड हजार मेट्रीक टन या पद्धतीचे भंगार आणले जाते. त्यानंतर त्यातून प्लॅस्टिक दाणे बनवून चटई बनविली जाते. टाकाऊ वस्तूतून टिकाऊ चटई निर्माण केली जाते. या उद्योगातून १० हजार जणांना रोजगार मिळाला आहे. जळगावात तयार झालेल्या चटई दुबई, केनिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये निर्यात केली जाते. चटई व मशिनरी निर्यातीमुळे जळगावात मोठे परकीय चलन उपलब्ध होते. तसेच स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध होत आहे. फेकून दिलेल्या प्लास्टिकवर प्रक्रिया करुन त्याचा पुन्हा वापर केला जातो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला या उद्योगातून एकप्रकारे हातभार लागत आहे.

शासकीय मदतीची अपेक्षा…

गेल्या २५ वर्षांपासून आम्ही चटई निर्मितीच्या व्यवसायात आहे. यात आजवर अनेक चढउतार अनुभवले आहेत. चटई उद्योग हा पर्यावरणपूरक व्यवसाय असल्याने त्याच्या भरभराटीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु या क्षेत्रातील उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुळात हा उद्योग लघुद्योग स्वरुपात असल्याने यात उच्चशिक्षित इंजिनिअर येत नाहीत. अर्धकुशल कामगारांकडूनच काम केले जाते. त्यामुळे या क्षेत्रात फार काही प्रगती झालेली नाही. चटईसाठी प्लास्टिकचा पुनर्वापर केला जातो. तसेच यातून परकिय चलन आणि पर्यावरणास हातभार लागतो. त्यामुळे शासनाने या उद्योगाच्या भरभराटीसाठी काही सवलती देऊन, जीएसटी माफ करावा अशी मागणी चटई निर्माता अरविंद पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा : 

The post जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती, हजारो तरुणांना रोजगार appeared first on पुढारी.