जळगाव : जामनेरमध्ये मधमाशीनं घेतला शेतकऱ्याचा जीव

जामनेर www.pudhari.news

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

शेतात काम करत असलेल्या मजुरांना डबा देऊन घरी परतत असताना युवा शेतकऱ्याच्या जिभेला मधमाशीने चावा घेतला. चावा घेतल्यानंतर मधमाशी घशात गेली अन् यात तरुणाचा मृत्यू झाला आहे.

अमजद खाँ अस्लम खाँ पठाण (२८, रा. लोंढ्री बुद्रूक, ता.जामनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे शेंगोळे रस्त्यावर शेती असून त्याच्या शेतात मजूर कामावर आले होते. या मजुरांच्या जेवणाचे डबे घेऊन अमजद खाँ पठाण हे दुचाकीवरून शेतात गेले. मजुरांसोबत कामाविषयी बोलणे झाल्यानंतर पुन्हा दुचाकीवरून घराकडे परतत असताना वाटेत अचानक पठाण यांच्या जिभेला मधमाशीने चावा घेतला. त्यानंतर ती मधमाशी घशात गेली. त्यामुळे पठाण यांना वेदना होऊन श्वासोच्छवास घेण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यांना रुग्णालयात हलविले असता, प्राथमिक उपचार मिळेपर्यंत अमजद खाँ पठाण यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने लोंढ्री गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पठाण हे पहूर येथील अजमुद्दीन शेख यांचे जावई आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : जामनेरमध्ये मधमाशीनं घेतला शेतकऱ्याचा जीव appeared first on पुढारी.