जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली ३३४ कोटींची मदत; कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

हवामानावर आधारीत फळपिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्यासाठी येणार्‍या विलंबाची दखल घेऊन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांसह कृषी व विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये शुक्रवार, दि.2 पर्यंत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये हवामानावर आधारित फळपीक विम्याची तब्बल ३३४ कोटी ७० लक्ष रूपयांची रक्कम जमा होणार असल्याचे विमा कंपनीतर्फे सांगण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

हवामानावर आधारीत फळपिक विमा ज्या शेतकर्‍यांंनी काढला आहे. याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपोटी ३७५ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली असून, इतर जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांना ती रक्कम मिळाली. मात्र जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अद्याप का मिळाली नाही? याबाबत ना. पाटील यांनी विचारणा केली. त्या अनुषंगाने, संबंधीत बैठकीत पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधींसोबत चर्चा केल्यानंतर, ही रक्कम शुक्रवारपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यासंदर्भात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ना. पाटील यांनी तंबी दिली. या अनुषंगाने ३३४ कोटी ७० लक्ष रूपयांची रक्कम ही शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे.

तालुकानिहाय नुकसान भरपाई…

अमळनेर- ५ कोटी ९८ लाख, भडगाव-२ कोटी ८६ लाख रूपये, भुसावळ ४ कोटी ६६ लाख, बोदवड ४ कोटी ८७ लाख, चाळीसगाव १ कोटी ०२ लाख, चोपडा ४२ कोटी ७१ लाख, धरणगाव ६ कोटी ३४ लाख, एरंडोल ३ कोटी ७२ लाख; जळगाव ३४ कोटी ८२ लाख, जामनेर १०० कोटी ५५ लाख, मुक्ताईनगर ३९ कोटी ३९ लाख, पाचोरा २ कोटी ९८ लाख, पारोळा ९२ लाख ९६ हजार, रावेर १२० कोटी ९२ लाख आणि यावल ६३ कोटी १६ लाख रूपये.

हेही वाचा:

The post जळगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली ३३४ कोटींची मदत; कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा appeared first on पुढारी.