Site icon

जळगाव : प्रेमविवाहाच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याचा चिरला गळा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या संशयातून भावाने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दगडू वामन खैरनार (वय ५२ रा. मेहुणबारे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात दीपक दगा गढरी (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, दगडू खैरनार हे त्यांच्या पत्नी लताबाई यांच्यासोबत राहतात. हे दाम्पत्य शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव जगदिश असे आहे. सुमारे ३ महिन्यांपूर्वी जगदिश याने मेहुणबारे गावातील मुलगी अश्विनी राजेंद्र चव्हाण हिच्याशी प्रेमविवाह केला होता. याचाच राग अश्विनी हिच्या परिवाराल होता. सदर प्रेम प्रकरणावरून वाद होऊन दोन्ही कुटुंबीयांमध्ये भांडणही झाले होते.

धारधार शस्त्राने वार

शुक्रवारी (दि.१६) दगडू खैरनार हे मेहुणबारे येथे धुळे रोडवरील हायस्कूल समोरील रेशन दुकानातून रेशन घेवून बसस्टॅडकडे पायी जात होते. यावेळी अश्विनीचा भाऊ सचिन राजेंद्र चव्हाण याने मोटारसायकलवर येवून त्याच्या हातातील धारधार शस्त्राने दगडू खैरनार यांच्या मानेवर मागील बाजूने वार केला. या हल्ल्यात खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, संशयित आरोपीच्या शोधार्थ स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

The post जळगाव : प्रेमविवाहाच्या रागातून भावाने बहिणीच्या सासऱ्याचा चिरला गळा appeared first on पुढारी.

Exit mobile version