जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे तापी नदीच्या जलपातळीत वाढ झाली असून, हतनुर धरणाचे १६ दरवाजे हे आता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. यापूर्वी कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु होता पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याल आले आहेत.

धरणातील अधिकच्या पाणीसाठ्याने नुकसान होऊ नये म्हणून एक विशिष्ट पातळी ओलांडल्यानंतर दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला जातो. सध्या हतनुर धरणामध्ये पाणीपातळी ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे १६ दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून, १९ हजार ३१७ क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला असून आता तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

ताथवडेतील पुलाखाली पाणीच पाणी

२६ गावांना सतर्कतेचा इशारा
हतनुर धरणाचे १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात अचानक पाणी वाढले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी साठ्यात वाढ होत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. शिवाय अजूनही विदर्भात पावसाचा जोर वाढला तर परस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय आहे हतनुर धरणाची स्थिती?
हतनुर धरणातील पाणी पातळी क्षमता ही २०८.८४० मीटर एवढी आहे. तर सध्या १६२.८० दलघमी पाणीसाठा धरणात आहे. एकूण क्षमतेच्या ४१.९६ टक्के पाणीसाठा असला तरी ज्या तुलनेत पाण्याची आवक आहे त्यामुळे विसर्ग करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ५४७ क्युमेक्स व १९३१७ क्युसेसने विसर्ग करण्यात आला आहे.

The post जळगाव : हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा appeared first on पुढारी.