धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण 

साठवणूक केलेली रासायनीक खते

धुळे : पुढारी वृत्तसेवा

येत्या खरीप हंगामासाठी राज्यात ५ लाख ३३ हजार मे.टन युरीया, २ लाख १५ हजार मे.टन डिएपी, २९ हजार मे.टन पोटॅश, ८ लाख ३९ हजार मे.टन संयुक्त खते आणि ५ लाख १५ हजार मे.टन सुपर फॉस्फेट असे एकूण २१ लाख ३१ हजार मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या खरीप हंगामातील गरजेच्या जवळपास ५० टक्के असून खरीप हंगामात राज्याला ४३ लाख १३ हजार मे.टन आणखी खत उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

राज्यामध्ये खरीपासाठी भरपूर खत उपलब्ध असले तरी शेतकऱ्यांनी पिकांनुसार माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा दिली पाहिजे. प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर पिकांवरील खर्च तर वाढतोच. परंतु सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते. तर आवश्यक ते खत न मिळाल्यासही उत्पादन आणि गुणवत्ता घसरते. रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायोफर्टिलायझर्स), नॅनो युरिया यांचाही वापर आवश्यकतेप्रमाणे करणे आवश्यक आहे. कृषी विभागाने कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मदतीने ‘कृषिक ॲप’ तयार करुन घेतले आहे. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना जिल्हयासाठी, माती तपासणी अहवालानुसार प्रत्येक पिकासाठी वेगवेगळया खतांची मात्रा आणि त्यासाठी लागणारी किंमत समजण्यास मदत होणार असून याच ॲपमधून तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रात कोण कोणती खते उपलब्ध आहेत याची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे खत खरेदी करणे सोपे होणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ‘कृषिक ॲप’ चा वापर शेतक-यांनी करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने पीएम प्रणाम ही योजना सुरु केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी खतांचा वापर मृदा तपासणीप्रमाणे केल्यामुळे एकुण खतांच्या अनुदानाच्या रक्कमेमध्ये बचत होणार असल्याने हे अनुदान केंद्र सरकारकडून राज्याच्या कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालाप्रमाणे खतांचा समतोल करावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post धुळे : खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता; कृषि आयुक्त सुनील चव्हाण  appeared first on पुढारी.