धुळे : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’!

Vedanta-Foxcon www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे वसुली धोरणच कारणीभूत आहे. ठाकरे सरकारच्या काळातच कंपनीसोबत झालेल्या वाटाघाटींचा तपशील जाहीर करा, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयकुमार रावल यांनी केले आहे.

अडीच वर्षांच्या काळात ठाकरे सरकारने केवळ वाट्याचाच विचार केल्याने घाटा सोसण्यास तयार नसलेल्या कंपन्यांनी महाराष्ट्रातून गाशा गुंडाळण्याची वेळ आल्याचा आरोप रावल यांनी केला. आघाडी सरकारमधील पक्षांचे कार्यकर्ते खंडणी वसुली करत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्याची आठवण करून देत रावल म्हणाले की, वेदान्ता-फॉक्सकॉन कंपनीसोबत चर्चा करण्याऐवजी वाटाघाटीसाठीच ठाकरे सरकारचा पाठपुरावा सुरू झाल्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याखेरीज कंपनीला पर्यायच नव्हता. फडणवीस सरकारच्या काळात गुंतवणुकीसाठी अव्वल असलेल्या महाराष्ट्रातून गाशा गुंडाळायला मविआ सरकारने भाग पाडल्याने गुंतवणुकीला मोठा फटका बसला आहे. राज्यातील प्रत्येक विकास प्रकल्पास विरोध करून वसुली करण्याची सवय महाराष्ट्राला नवी नाही, असा टोलाही त्यांनी मारला. गेल्या अडीच वर्षांतील धोरण वसुलीच्या तगाद्याला कंटाळून अनेक गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरविली असून, मविआ सरकारच्या वसुली धोरणामुळे महाराष्ट्र उद्योगस्नेही राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

राज्याकडे यांनी पाठ फिरविली

ठाकरे सरकारच्या काळात ओलाचा प्रकल्प अधांतरी राहिला तर टेस्लाने पाठ फिरविली. एमआयडीसीमधील किती उद्योग ठाकरे सरकारच्या काळात बंद पडले त्यावर संशोधन करायला हवे. दोन महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारवर आगपाखड करून पांघरुण घालणाऱ्या मविआने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आमदार जयकुमार रावल यांनी केली.

हेही वाचा:

The post धुळे : ठाकरे सरकारच्या वसुली धोरणामुळेच वेदान्ता-फॉक्सकॉनचा ‘जय महाराष्ट्र’! appeared first on पुढारी.