नाशिक : गळ्यात कांद्याच्या माळा घालत स्वाभिमानी उतरली रस्त्यावर

स्वाभिमानी आंदोलन,www.pudhari.news

वणी/ दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्न भेडसावत आहे. या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरली आहे.

नाशिकमध्येही वणी येथे स्वाभिमानीचे रास्तारोको आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने शिर्डी – सुरत हायवेवर प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात रास्तारोको केला आहे.  शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या व द्राक्षाच्या माळा तसेच जिल्हा बँकेच्या नोटिसांच्या माळा घातल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे, द्राक्षे फेकत व जिल्हा बॅंकेच्या नोटीसा जाळत निषेध नोंदवला आहे. या प्रसंगी शेतकरीकृती समितीचे अध्यक्ष प्रशांत कड, गंगाधर निखाडे, संतोष रेहरे, विलास भवर, संदीप उफाडे यांच्यासह मोठ्या संख्यने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या आहेत मागण्या… 

थकित वीज बिलापोटी वीज कंपनी शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन तोडत आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असताना विजेचे कनेक्शन तोडले तर शेतकऱ्यांचे पीकं करपून जातील व तो उध्वस्त होईल म्हणून हे विजेचे कनेक्शन तोडू नये तसेच कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढ 31 मार्चपर्यंत देऊन 50 टक्के पेक्षा कमी बील घेऊन वीजबिलातून शेतकऱ्यांना मुक्त करावे. तसेच रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सबसिडी देऊन रासायनिक खतांच्या किमती नियंत्रित करायला हव्या. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा साठी तक्रारी नोंदवल्या आहे. त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तातडीने देण्याचे आदेश द्यावेत. बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्यांची खातेनीहाय चौकशी करावी. सोयाबीन, कपाशी, कांदा द्राक्ष यासारख्या अनेक पिकांचे बाजारभाव पडले आहे. सरकारने हस्तक्षेप करून हे बाजारभाव पूर्ववत करण्यासाठी हस्तक्षेप करून प्रयत्न करावे. अशा प्रमुख मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर रस्ता रोको करत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गळ्यात कांद्याच्या माळा घालत स्वाभिमानी उतरली रस्त्यावर appeared first on पुढारी.