नाशिक : …..तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद

देवळाली कॅम्प www.pudhari.news

नाशिकरोड पुढारी वृत्तसेवा

जम्मू – काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना दररोज कंठस्नान घातले जात आहे. मुंबई हल्ल्यातील कसाब पोलिसांच्या एवजी जवानांच्या हाती लागला असता तर त्याचा तिथेच जागेवरच खात्मा केला असता, त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याची वेळच येऊ दिली नसती, असे प्रतिपादन कारगील योद्धा दीपचंद यांनी केले.

देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शनिवारी (दि.१३) स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ विजय मेधणे उपस्थित होते. दीपचंद  म्हणाले कुठल्याही राजकिय नेत्यांची मुले शक्यतो सैन्यात दाखल होत नाहीत. परंतु भारतात आजही अशी अनेक युवा आहे. ज्यांनी  देशासाठी शहिद झालेल्या आपल्या वडीलांचा चेहरा बघितलेला नाही, त्याचप्रमाणे शहीद जवानांनाही आपल्या पोटच्या मुलाला पाहण्याचे सुख घेता आलेले नाही. डॉ. विजय मेधणे यांनी सांगितले की, सेवानिवृत्त लष्करी जवान दीपचंद यांनी कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावली असून यामध्ये त्यांनी दोन्ही पाय आणि एक हात गमावला आहे. त्यामुळे त्यांना कारगील योद्धा म्हणून गौरविण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख उपप्राचार्य प्रा. दिलीप जाधव, प्रा. डॉ. कैलास लभडे, डॉ.अविनाश काळे, प्रा.सतीश कावळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.मिलिंद ठाकरे, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट पुरुषोत्तम गांगुर्डे, प्रा.संतोष कर्डक आदींनी परिश्रम घेतले. सविता आहेर यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : .....तर लष्करी जवानांकडून कसाबचा जागेवर खात्मा : कारगिल योद्धा दीपचंद appeared first on पुढारी.