नाशिक : बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी चार संशयितांना जामीन

बिबट्या कातडी तस्करी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथील बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील चारही संशयितांची वनकोठडीची मुदत सोमवारी (दि. १२) संपल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सहा दिवसांच्या वनकोठडीत अपेक्षित रिकव्हरी आणि चौकशी पूर्ण झाल्याची माहिती वनपथकाने न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने चारही संशयितांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

पश्चिम नाशिक वनविभागाच्या इगतपुरी वनपथकाने गेल्या आठवड्यात बिबट्याच्या कातडी तस्करीचा डाव उधळून लावला होता. या कारवाईत प्रकाश लक्ष्मण राऊत (४३, रा. रांजणपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर), परशुराम महादू चौधरी (३०, रा. चिंचुतारा, ता. मोखाडा, जि. पालघर), यशवंत हेमा मौळी (३८, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर), हेतू हेमा मौळी (३८, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर) यांना ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने वनकोठडी सुनावल्यानंतर संशयित तस्करांकडून पहिल्या कारवाईत चिंचुताराच्या जंगलात पुरलेले बिबट्याचे विविध अवयव हस्तगत केले होते.

तपासाचे पुढे काय?

इगतपुरी वनपथकाने दुसऱ्या कारवाईत कुडवा (जि. पालघर) येथे एका संशयिताच्या घराची झाडाझडती घेत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडाचे काही अवयव जप्त केले होते. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे असतानाच वनविभागाने न्यायालयात चौकशी पूर्ण होण्याचा दावा केला. वनविभागाने पुन्हा कोठडीची मागणी न करता, दाेषारोपपत्र दाखल करण्याची तयारी दाखविल्याने तपासाचे पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संशयित तस्करांकडून वनकोठडीत माहिती मिळाली असून, त्याआधारे पुढेही तपास कायम राहणार आहे. वनकोठडीच्या कालावधीत अपेक्षित वन्यजीवांचे अवयव मिळविण्यात वनविभागाला यश आले आहे. संशयित तस्करांविरोधात सक्षम पुरावे प्राप्त झाल्याने दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. – केतन बिरारीस, वनपरिक्षेत्र अधिकारी (इगतपुरी).

हेही वाचा:

The post नाशिक : बिबट्या कातडी तस्करी प्रकरणी चार संशयितांना जामीन appeared first on पुढारी.