पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
“मालनगाव परिसरातील कृषी पंपासाठी आठ तास वीज द्या” या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मालनगांव ते दहीवेल असा ७ किलोमीटर पायी मोर्चा काढून महावितरणचे लक्ष वेधत निवेदन दिले. शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज दिली जाईल असे आश्वासन यावेळी महावितरण अभियंता अधिका-यांनी दिले. साक्री तालुका काँग्रेसच्या वतीने माजी खासदार बापू चौरे व काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढला. मालनगाव येथील परीसरातील खरडबारी, बरडीपाडा, बोडकीखडी, सातरपाडा येथे रब्बी हंगामात दिवसातून फक्त चार तासच विजपुरवठा केला जातो. त्यातही वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो. या पार्श्वभूमीवर संबंधित खात्याला जाग यावी यासाठी सोमवारी, दि.5 शेतकऱ्यांनी मालनगाव ते दहीवेल असा ७ किलोमीटर पायी चालत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चा दहिवेल येथे पोहचल्यानंतर साक्री तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांनी मालनगांव व परिसरातील गावांची समस्या अधिका-यांसमोर मांडली. तसेच बापू चौरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत वीजवितरण कंपनीने पूर्ण वेळ लाईट देण्याची मागणी केली. उपकार्यकारी अभियंता पी. आर.ढवळे, सहाय्यक अभियंता एस.टी.नागरे यांनी पूर्ण वेळ लाईट देण्यात येईल तसेच एका वीज कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी माजी सभापती प्रतिभा सूर्यवंशी, एकनाथ गुरव, सभापती शांताराम कुवर, जि.प.सदस्य विश्वास बागुल, प्रवीण चौरे, सरचिटणीस गणेश गावीत, सुक्राम महाले, सुक्राम चौरे, युवराज चौरे, रोहिदास सूर्यवंशी, महेंद्र चौधरी, किसन वंजारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
- शिर्सुफळला वानराच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू
- Largest Continent : पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता?
- कोल्हापूर : फराळे साखर कारखान्याची विक्री होणार? गळीत हंगाम रखडला, हजारो रोजगार बुडाले
The post पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा appeared first on पुढारी.