बस अपघातातील मृतांमध्ये अमळनेरातील चौघे ; ‘इतक्या’ जणांची ओळख पटली

जळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदूर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. या अपघातातील ८ मृतांची ओळख पटली असून मृतांमध्‍ये अमळनेर तालुक्‍यातील पती-पत्‍नीसह चालक व वाहकाचा समावेश आहे.

जळगाव विभागातील अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर बस सकाळी साडेसातला इंदूर येथून परतीच्‍या मार्गाला लागली असताना खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या खलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी होते. यात १३ प्रवाशांचा मृत्‍यू झाला आहे.

बसमधील मृत प्रवाशी

बसवाहक प्रकाश श्रवण चौधरी (वय ४०, रा. शारदा कॉलनी अमळनेर), चालक-चंद्रकांत एकनाथ पाटील (वय ४५, अमळनेर), चेतन राम गोपाल (जांगिड़, नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान), जगन्नाथ हेमराज जोशी (वय ७०, रा. मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान), निंबाजी आनंदा पाटील (वय ६०, पिळोदा अमळनेर), कमलाबाई नीबाजी पाटिल (वय ५५, पिळोदा अमळनेर) या मृतांची ओळख आधारकार्डमुळे पटली आहे. तसेच अरवा मुर्तजा बोरा (वय २७, रा. मूर्तिजापुर, अकोला), सैफुद्दीन अब्बास (नूरानीनगर, इंदौर) यांची ओळख नातेवाईकांमुळे पटली आहे.

मयतांच्या नातेवाईकांना मिळणार १० लाखांची मदत

याशिवाय अद्याप तीन मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे. अपघातग्रस्त बस नदीतून बाहेर काढण्यात आली असून, अपघातात अद्याप किती लोक असतील याची नेमकी माहिती मिळालेली नाही. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटी महामंडळाकडून १० लाख रूपये मदत देण्यात येणार आहे. तसेच रूग्णालयात उपचारासाठी दाखल रूग्णांचा उपचारही एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे. एसटी महामंडळाने दुपारी १.३१ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार ही माहिती प्रसिध्दीसाठी दिली आहे.

The post बस अपघातातील मृतांमध्ये अमळनेरातील चौघे ; 'इतक्या' जणांची ओळख पटली appeared first on पुढारी.