Site icon

बस दुर्घटना : जिल्हा प्रशासनाची कार्यवाही; ७ लाखांची मिळणार मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद महामार्गावरील बस दुर्घटनेत १२ निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला. अपघातामधील सर्व मृतांची ओळख पटली आहे. मृतांच्या वारसांना राज्य ५ लाख, तर केंद्र शासन दोन लाखांची आर्थिक मदत करणार आहे. जिल्हा प्रशासनाने मदतीसाठीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

यवतमाळवरून मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसला गेल्या शनिवारी (दि. ८) अपघात झाला. अपघातात ४३ प्रवासी जखमी झाले. बारा प्रवाशांचा हाेरपळून मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार केल्यानंतर तब्बल ३८ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आरोग्य यंत्रणेसमोर अपघातात मृत झालेल्या प्रवाशांची ओळख पटविण्याचे आव्हान उभे ठाकले होते. त्यातही ९ प्रवाशांची ओळख पटल्याने त्यांचे मृतदेह वारसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, तिघांची ओळख होत नसल्याने त्यांची डीएनए टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी (दि.११) प्राप्त झाला असून, त्यात तिघांची ओळख पटली आहे. अपघातामधील सर्व मृतांची ओळख पटल्याने जिल्हा प्रशासनाने आता वारसांना आर्थिक मदतीसाठीची पुढील कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार मदतीसाठीचा राज्य व केंद्र शासनाला सविस्तर अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मृतांच्या वारसांना लवकरच मदत मिळण्याची आशा आहे.

हेही वाचा:

The post बस दुर्घटना : जिल्हा प्रशासनाची कार्यवाही; ७ लाखांची मिळणार मदत appeared first on पुढारी.

Exit mobile version