महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक लाख कोटी : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि सांगलीला जो वारंवार महापूर येतो, तो रोखण्यासाठी जागतिक बँकेला प्रकल्प सादर करण्यात आला आहे. या माध्यमातून पुराचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाड्यात वळविण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. या प्रकल्पासह नाशिक – नगर आणि विदर्भाच्या पाणी प्रकल्पाला लागणारा एक लाख कोटी रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पाला धक्का न लावता उभा करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे झाली. त्यात मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, कोल्हापूर आणि सांगलीला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी 2019 मध्येच जागतिक बँकेला एक प्रकल्प दिला होता. त्यावेळी जागतिक बँकेने त्यास तत्त्वत: मान्यताही दिली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला गती दिली गेली नाही.

आता आम्ही पुन्हा एकदा हा प्रकल्प हाती घेतला असून, लवकरच त्याला गती दिली जाईल. आमचा असा दावा आहे की, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोघांचा हिस्सा सोडल्याव्यतिरिक्त हे पाणी आहे. हे पुराचे पाणी वळण बंधार्‍याच्या तसेच टनेलच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह उजनीच्या माध्यमातून मराठवाड्यापर्यंत कसे आणता येईल याबाबतचा आमचा प्रयत्न असेल, असेही फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी नाशिक-नगरच्या पाण्याचा प्रश्न तसेच विदर्भातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रकल्प हाती घेतल्याची माहिती दिली. याकरिता सर्व प्रकल्पांसाठी एक लाख कोटींचा निधी लागणार असून, तो आम्ही राज्याच्या अर्थसंकल्पाला हात न लावता उभा करू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, जागतिक बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाला गती दिल्यास कोल्हापूर-सांगलीमध्ये दरवर्षी येणार्‍या महापुराचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.

महापुरुषांचे मोठे योगदान : उदयनराजे भोसले

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी महापुरुषांबद्दल केल्या जात असलेल्या बेताल वक्तव्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, विकृतीत वाढ का होतेय, हेच समजत नाही. महापुरुषांनी देशाच्या प्रगतीसाठी विचार मांडले आहेत. त्यांच्या उंचीपर्यंत आपण जाऊ शकत नाही. वक्तव्य करणार्‍यांची वैचारिक पातळी समजून घ्यावी, देशाच्या विकासासाठी विचार आणि वेळ खर्च केला तर जास्त उचित ठरेल, महापुरुषांनी मोठे योगदान दिल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.

The post महापुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक लाख कोटी : देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.