सत्तेच्या लोभापायी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले : बावनकुळेंची घणाघाती टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस धार्जिणे बनले आहेत. राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात, आदित्य ठाकरे मात्र राहुल गांधींना मिठी मारतात. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी माफ केले नसते. सत्तेच्या लोभापायी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे विचार स्वीकारले आहेत. आता केवळ पक्षाची घटना बदलणे बाकी आहे. सामनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्क्रीप्ट छापून येते. हिंदुत्वावादी विचार उद्धव ठाकरेंनी त्यागल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (दि.२०) येथे केली.पक्ष संघटन दौऱ्यानिमित्त जळगावमध्ये आले असता ते पत्रकार परिषद बोलत होते.

यावेळी शिवसेनेवर निशाणा साधताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर लोटांगण घेतात. शरद पवारांनी त्यांचा बुध्दीभ्रम केला आहे. खरोखरच सावरकरांच्या अपमानाची चीड असेल, तर त्यांनी महाविकास आघाडी सोडून बाहेर पडावे.

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंच्या निष्क्रियतेमुळे उद्योग बाहेर गेले…

उद्योग आणण्यासाठी उद्योजकांशी संवाद साधून अडचणी सोडविणे महत्वाचे असते. मात्र, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी एकही बैठक घेतली नाही. उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार केले नाही. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ तास काम करुन उद्योजकांच्या समस्या सोडवत आहेत. उद्योगांसाठी आवश्यक साधने पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी मात्र आपल्या कार्यकाळात काय दिलं? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला.

राज्यापालांवर बोलण्याचा अधिकार नाही- बावनकुळे

छत्रपती शिवाजी महाराज देश आणि महाराष्ट्रासाठी आदर्श असून, ते सर्वांच्या ह्रदयात आहेत. राज्यपालांनी जे काही वक्तव्य केले आहे. त्यात त्यांची नेमकी भावना काय होती, हे पहावं लागेल. विरोधकांनी या विषयाला संवेदनशील बनवून राजकारण करत आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद असून ते कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यांचे अधिकार मोठे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही.

Chandrashekhar Bawankule  : अपमान खपवून घेणार नाही…

राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. कुठलंही महान कार्य करताना त्यामागे असलेला हेतू महत्वाचा ठरतो. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचे तंत्र दिले आहे. सावरकरांच्या भूमिकेमागे गनिमी कावा होता. इतिहासात असे अनेक दाखले आहेत, जिथे देशहितासाठी कधी-कधी माघार घ्यावी लागते. मात्र, यावरुन सावरकर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुणी अपमान करत असेल, तर त्याचे समर्थन होत नाही.

खडसेंनी वंजारी समाजाची माफी मागावी..

कुठल्याही नेत्याने बोलताना सामाजिक भान राखणे गरजेचे आहे. कुठलाही नेता समाजाच्या पाठिंब्यानेच निवडून येतो. त्यामुळे कोणत्याही समाजावर टीका करणे शोभनीय नाही. एकनाथ खडसेंनी एखाद्या समाजाबद्दल जे विधान केले आहे. यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी माफी मागून प्रकरण संपवावे, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

The post सत्तेच्या लोभापायी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले : बावनकुळेंची घणाघाती टीका appeared first on पुढारी.