निफाड (नाशिक) : रानवड साखर कारखाना नव्याने भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनाने चालढकल न करता आठ दिवसांत निविदा काढावी अन्यथा शेतकऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा रासाका बचाव कृती समितीने प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.
अन्यथा रासाका बचाव कृती समितीतर्फे बेमुदत उपोषणच...
रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी रासाका बचाव कृती समितीने राज्यातील मंत्र्यांसह सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. नोव्हेंबर महिना सुरू झाला असून, लगतच्या तालुका व जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत, मात्र अद्याप निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे रासाका बचाव कृती समितीतर्फे रासाका सुरू करण्यासंदर्भात त्वरित निविदा प्रसिद्ध करावी. शेतकरी कामगारांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अन्यथा रासाका बचाव कृती समितीतर्फे बेमुदत उपोषणचा इशारा कृती समितीतर्फे रासाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे, उपाध्यक्ष बाबूराव सानप, दत्तू मुरकुटे, सुयोग गिते, हेमंत सानप, वैभव कापसे, विकास रायते, दीपक वडघुले, हरीश झाल्टे, अनिरुद्ध पवार, सचिन वाघ आदींसह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
ऊसतोड हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी रासाकाची निविदा निघालेली नाही. शासनाने आता अंत पाहू नये. आठ दिवसांत कारखान्यासंदर्भात निविदा न काढल्यास शेतकऱ्यांना घेऊन कृती समिती उपोषण करणार आहे. - बाबूराव सानप ऊस उत्पादक शेतकरी