Aditya Thackeray : उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ होतो

आदित्य ठाकरे

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
गद्दारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. 40 गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाहीत. गद्दारांना उत्तरे देण्यास आपण कटिबद्ध नाही. गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला? सत्तेत होते तेव्हा अडीच वर्षे गप्प का राहिले? असे अनेक सवाल युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटीर आमदारांना केले.
मनमाड येथे आयोजित शिवसंवाद यात्रेत आदित्य बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला मोठ्या संख्येने शिवसेना समर्थकांची गर्दी होती. यावेळी मंचावर त्यांच्यासमवेत आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, जगन्नाथ धात्रक, राजेंद्र देशमुख, गणेश धात्रक, दिलीप सोळसे, संतोष गुप्ता, मयूर बोरसे, अल्ताफ खान, पिंटू नाईक, संजय कटारिया, सुनील पाटील, राउफ मिर्झा, रमेश हिरण, सुधाकर मोरे, मुक्ता नलावडे, रेणुका जयस्वाल, सुनीता मोरे, संतोष जगताप उपस्थित होते.

बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आपण उद्धव ठाकरे यांना जाहीररीत्या प्रश्न विचारत असल्याचे पत्रक गुरुवारी प्रसिद्ध केले होते. त्यामुळे आजच्या शिवसंवाद यात्रेकडे तमाम नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते. परंतु कांदे यांच्या प्रश्नांची त्यांनी दखलही घेतली नाही. गद्दारांना उत्तरे देण्यास आपण कटिबद्ध नसल्याचे सुरुवातीलाच जाहीर करत आदित्य यांनी आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला.

पक्षाचा आदेश सर्वोच्च असतो तो तुम्ही का पाळला नाही? उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरांनी गद्दारी केली आहे. शिवसैनिक कदापि तुम्हाला माफ करणार नाहीत. शिंदे सरकारवर टीका करत आदित्य म्हणाले की, हे सरकार कोसळणारच आहे. आजच लिहून देतो. हे तात्पुरते सरकार आहे. अल्पमतातील सरकार आहे. मी विकलो गेलो नाही. आमदार विकले गेले आहेत. राज्याचे राजकारण घाणेरडे झाले आहे. माणुसकी तोडून राजकारण सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे भेटत नव्हते, असा आरोप करण्यात आला. परंतु त्यांच्या दोन गंभीर शस्त्रक्रिया झाल्या म्हणून भेटले नसल्याचे स्पष्टीकरण आदित्य यांनी यावेळी दिले. उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ होतो आणि आजही आहे. आजारी असतानाही उद्धव ठाकरेंनी काम थांबवले नाही. महाराष्ट्राची सेवा थांबविली नाही. परंतु आजारपणाचा फायदा घेत गद्दारांनी आमदार जमविले. आमदार विकले गेले, असे आरोप आदित्य यांनी याप्रसंगी केले.गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात. तरीही गद्दारांना भेटीसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे चोख प्रत्युत्तर युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले. बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली होती. तसेच शहरात ठिकठिकाणी बॅनर लावत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण कांदे यांची भेट आदित्य ठाकरे यांनी नाकारली व भेटीसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे सांगितले.

हेही वाचा :

The post Aditya Thackeray : उद्धव साहेबांचे दुःख मी बघितले आहे. मुलगा म्हणून मी जवळ होतो appeared first on पुढारी.