Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात १९६ गावांत निवडणुकांची रणधुमाळी

ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींमध्ये (Gram Panchayat Election) सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, इच्छुक उमेदवारांना सोमवार (दि.२८)पासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जासाठी २ डिसेंबरची अंतिम मुदत आहे. त्यामुळे तहसील कार्यालयांमध्ये पुढील पाच दिवस लगबग असणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने निर्मिती झालेल्या तसेच मागील निवडणुकांमधून वगळलेल्या अशा राज्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १९६ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. जनतेमधून थेट सरपंचासह सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे.

सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवार (दि.२८) ते शुक्रवार (दि. २)पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. तसेच दाखल अर्जांची ५ डिसेंबरला छाननी, तर ७ डिसेंबरला दुपारी तीनपर्यंत माघारीची मुदत देण्यात आली आहे. तसेच १८ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होणार असून, २० तारखेला मतमोजणी केली जाईल. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात दोन टप्प्यांत २०० च्या आसपास ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांना कमी-अधिक प्रमाणात यश मिळाले. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात १९६ पैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपला झेंडा राेवण्यासाठी राजकीय पक्ष झाडून कामाला लागले आहेत.

Gram Panchayat Election : तालुकानिहाय ग्रामपंचायती

बागलाण ४१, चांदवड ३५, निफाड २०, कळवण १६, नांदगाव १५, नाशिक १४, देवळा १३, मालेगाव १३, सिन्नर १२, येवला ०७, दिंडोरी ०६, इगतपुरी ०२, त्र्यंबकेश्वर ०१, पेठ ०१.

हेही वाचा :

The post Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यात १९६ गावांत निवडणुकांची रणधुमाळी appeared first on पुढारी.