Nashik : सुरगाण्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट गाठलं गुजरात

सुरगाणा,www.pudhari.news

सुरगाणा : (जि. नाशिक) प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव गुजरातमध्ये जाण्याच्या मुद्दयांवर ठाम असून आज त्यांनी थेट गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वासदा तहसील कार्यालयात धडक मारली. गुजरात सीमेवरील महाराष्ट्रातील गावांना गुजरातमध्ये सामाविष्ट करुन घ्यावे अशी मागणी गुजरात सरकारकडे ग्रामस्थांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चिंतामण गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक असल्याने वीज, पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण आशा मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांनी उठाव केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा झाला तरीही मूलभूत सोयीसुविधांसाठी  आदिवासी पाड्यावरील बांधवाना झगडावं लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आधी सुरगाणा येथील तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी गुजरातच्या वासदा तालुक्यातील तहसील कार्यालय गाठलं. तहसीलदार यांनीही राज्य सरकाकडे पुढील कार्यवाहीसाठी निवेदन पाठविणार असल्याचे आश्वासन दिले.

दैनिक पुढारीने गेल्या अनेक वर्षांपासून सुरगाणा तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील ग्रामस्थांच्या समस्या मांडल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांची दिवसा आणि मध्यरात्रीची भटकंती इथे आजही सुरुच आहे. सामाजिक कार्यकर्ते पुढे येताय सुविधा देतात, मात्र प्रशासन तात्पुरती मलमपट्टी आणि घोषणा या पलीकडे काहीच करत नाहीत. आजही उंबरठाण मधील आरोग्य केंद्राला भेट दिली. तिथल्या रुग्णांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या, रुग्णालयात दाखल करायचे तर वाहन नाही, रुग्णवाहिका बोलवायची तर मोबाईलला रेंज नाही. त्यामुळे वैद्यकीय सेवा मिळाली नसल्याने महिलेची घरीच प्रसूती झाली. अशी एक नाही अनेक उदाहरणे आहेत.  बहुतेक रुग्ण गुजरात राज्यातील धरमपूर, वासदा, वसलाड, डांग आशा गावात जात असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.

केवळ आरोग्यच नाहीतर उच्च शिक्षणासाठीही येथील विद्यार्थ्यांना गुजरात गाठावे लागत आहे. दळणवळणचीही अशीच बोंब आहे. आम्ही गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याच्या सीमारेषेचा आढावा घेतला. एकीकडे महाराष्ट्राचे रस्ते खंड्याची साथ सोडत नाही आणि दुसरीकडे गुजरातच्या शेवटच्या टोकावर ही चकचकीत रस्ते बघायला मिळत आहेत. दोन्ही राज्यातील फरक इथेच अधोरेखित होत आहे. महाराष्ट्र मधील नागरिक महिलांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्याच्या सीमारेषेला लागून असणाऱ्या गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील बिलदा गावातल्या रामदास चौधरी यांच्या घरी गेलो. महाराष्ट्रला लागून असल्यानं चौधरी कुटुंबीय मराठी बोलतात पण गुजरात सरकारची स्तुती करताना थांबत नाही.

एकीकडे उद्योग मंत्री कर्नाटक सीमेवर जाऊन कर्नाटक राज्यात जाण्याची मागणी करण्यासाठी जत तालुक्यात पोहचले. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरगाणा तालुक्यात पोहचतात. त्यावेळी सुरगाणाचे ग्रामस्थ मात्र गुजरातमध्ये धडकतात आणि प्रश्न सोडविण्याची मागणी करत असल्याने कर्नाटक महाराष्ट्र पाठोपाठ महाराष्ट्र गुजरात संघर्ष पेटण्याची शक्यता वाढू लागली आहे.

हेही वाचा :

The post Nashik : सुरगाण्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट गाठलं गुजरात appeared first on पुढारी.