Site icon

राजकारण म्हणजे पैसे कमविण्याचा धंदा नाही : नितीन गडकरी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राजकारण म्हणजे, पैसे कमाविण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे, समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण होय. तर राजनिती म्हणजे लोकनिती, धर्मनिती होय. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातून हे उद्दिष्टे आहे. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणे अपेक्षित असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

नामको हॉस्पिटलच्या प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल कार्डिअॅक केअर सेंटरचे लोकापर्ण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल, नामको बॅकेचे अध्यक्ष वसंत गीते, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, ॲड. राहूल ढिकले, सीमा हिरे, महेंद्र ओस्तवाल, नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, सचिव शशिकांत पारख, सुरेश पाटील आदी उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी स्वत:चे आरोग्य संभाळले पाहिजे. कुंटूबांच्या उदरनिर्वाहासाठी भष्ट्राचार न करता पैसे कमविण्याचा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे.

नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हुकूमचंद बागमार यांनी लावलेले वृक्ष आज खऱ्या अर्थाने वटवृक्ष झाला आहे. नामको बॅकेने सहकारातूनही उत्तम संस्था उभी राहू शकते, याचा नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. तसेच हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक आजारावर उपचार करता येणे शक्य होणार आहे. मात्र, रोगच होवू नये यासाठी तंत्रज्ञान, आरोग्य सुविधाचा वापर करण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. तर नामको हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याची, चांगले काम करण्याची संधी मिळाली, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल यांनी सांगितले.

नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी प्रास्तविकात सहकार क्षेत्रातून नामको हास्पिटलची निर्मिती हा देशातील पहिला उपक्रम आहे. कॅन्सरसह विविध आजारावर या ठिकाणी उपचार केले जात असल्याचे सांगितले. ट्रस्ट सचिव शशिकांत पारख यांनी सुत्रसंचालन केले.

जनआर्शिवादामुळेच अपघातातून बचावला

आतापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे २५ हजार नागरिकांची शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली. १९८० मध्ये आमदार झाल्यापासून हा उपक्रम सुरू आहे. लोकांच्या आर्शिवादामुळे २००४ मध्ये झालेल्या वाहन अपघातात संपूर्ण कुंटूब सुखरूप बचावल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

उदार अंतरकरणाने दान करण्याची गरज

समाजात अनेक लोक पैसे कमवितात. गरजा पूर्ण करण्यासाठी चांगल्या मार्गाने पैस कमविलचे पाहिजे. आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर उदार अंतरकरणाने समाजातील दीन, दुर्बल घटकांना मदत केली पाहिजे. समाजात दान करण्याची संख्या कमी आहे. सामाजिक संदेशात, सामाजिक जबाबदारीतून प्रत्येकाने लोकांची सेवा केली पाहिजे. असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post राजकारण म्हणजे पैसे कमविण्याचा धंदा नाही : नितीन गडकरी appeared first on पुढारी.

Exit mobile version