Site icon

नाशिक : ‘शासन आपल्या दारी’चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरामध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा गोंधळ अद्यापही कायम आहे. शासनाने कार्यक्रमासाठी नव्याने तारीख कळविली आहे. शासनाच्या नव्या मुहूर्तानुसार एक दिवस उशिरा म्हणजेच शनिवार, दि. १५ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाकडून राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिकमध्ये शुक्रवारी (दि. १४) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर मंडप उभारणीसह अन्य कामे हाती घेतली गेली. मात्र, राज्यस्तरावरून सोमवारी (दि. १०) नव्याने फतवा काढण्यात आला आहे. यानुसार हा कार्यक्रम नियोजित तारखेनुसार एक दिवस उशिरा घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा बुचकळ्यात पडले आहे.

राज्यातील सत्तानाट्यामुळे शहरात दि. ८ जुलै रोजी होणारा कार्यक्रम १५ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सोयीच्या वेळेनुसार शुक्रवारी (दि. १४) कार्यक्रम घेण्याचे आदेश गेल्या आठवड्यात देण्यात आले हाेते. परंतु, शासनाने आता पुन्हा एकदा कार्यक्रमासाठी शनिवार (दि. १५) ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या आयोजनावरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : 'शासन आपल्या दारी'चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख appeared first on पुढारी.

Exit mobile version