अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांचा शेतकऱ्याने अडवला रस्ता; अंत्यसंस्कार दिवसभर रखडला

Nashik

इगतपुरी; पुढारी वृत्तसेवा : इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी येथे रस्ता नाही म्हणून मंगळवारी (दि. २५) गरोदर मातेला बाळासह आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच आज (दि. २६) टाके घोटी येथे एका शेतकऱ्याने अंत्यविधी साठी मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांची पायवाट अडवली. या भागात दुसरा कोणताही रस्ता नसल्याने मृतदेह दिवसभर तिथेच होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या मृतदेहाला पायवाट मोकळी करुन मिळाली.

आदिवासी कातकरी पाड्यावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. त्यामुळे त्या वाडीतील नागरिक एका शेतकऱ्याचा शेतातील पायवाटेने ये जा करतात. कातकरी पाड्यावरील वस्तीत आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत न्यायला एकमेव पायवाटेने शेतातून जात असतांना संबंधित मालकाने इथून मृतदेह नेऊ नका असे सांगत मज्जाव केला. म्हणून हा अंत्यविधी दिवसभर अडून पडला होता. याबाबत इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर आणि इगतपुरी पोलीस यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस बंदोबस्तात पायवाट मोकळी करून दिली. त्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत नेवून अंत्यविधी करण्यात आला.

एकीकडे रस्ता नाही म्हणून रुग्णाला जीव गमवावा लागतो तर दुसरीकडे मृतदेहाला स्मशानभूमीत नेण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. आदिवासी कातकरी समाजासाठी आदिवासी विकास विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना आहेत. मात्र कातकरी वस्त्यांमध्ये त्या योजना पोहोचल्या नाहीत. म्हणूनच अनेक गावांत आदिवासींची दशा अजूनच बिघडत आहे अशी प्रतिक्रिया एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी दिली.

The post अंत्यविधीसाठी मृतदेह घेऊन जाणाऱ्या लोकांचा शेतकऱ्याने अडवला रस्ता; अंत्यसंस्कार दिवसभर रखडला appeared first on पुढारी.