जळगाव : अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांची दोषींवर कारवाईची मागणी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्‍या शेतकऱ्याच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

जयवंत यशवंत कोळी (वय ३६) यांचे अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे भाल्या नाला परिसरात शेती आहे. ते सोमवारी रात्री (दि. १६) शेतीला पाणी देण्यासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी (दि. १७) त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने ते गंभीर जखमी झाले. यानंतर नातेवाईक आणि इतर लोकांनी प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारसाठी नेले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे संतप्त नातेवाईकांनी दोषींवर कारवाईसाठी मृतदेह थेट अमळनेर तहसील कार्यालयात आणल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वाळू वाहतूकदारांशी झाले होते वाद

दरम्यान दोन दिवसांपूर्वी जयवंत कोळी यांनी अवैध वाळू वाहतूकदारांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून वाद निर्माण झाले होते. तक्रारी करूनही महसूल खात्याचे अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष झाल्याने जयवंतचा जीव गेल्याची तालुक्यात चर्चा आहे.

हेही वाचा

The post जळगाव : अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांची दोषींवर कारवाईची मागणी appeared first on पुढारी.