धुळे-अमळनेर रस्त्यावरील अपघातात ३ जण ठार; ५ जण जखमी

धुळे; पुढारी वृत्तसेवा: नाशिक येथून गंध मुक्तीचा कार्यक्रम आटोपून अमळनेर येथे परत जाणाऱ्या कारला झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर ५ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.१०) धुळे – अमळनेर मार्गावरील नवलनगर गावाजवळ घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील पाटील परिवार त्यांच्या नातेवाईकांच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमाला (एमएच 04 एफ झेड 3679) कारमधून नाशिक येथे गेले होते. हा कार्यक्रम आटोपून ते धुळे मार्गे अमळनेरला परत जात होते. यावेळी धुळे तालुक्यातील नवलनगर गावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, कार रस्त्याच्या कडेला उलटली.

या भीषण अपघातात सरलाबाई पंडित पाटील (वय 45), मिनाबाई राजेंद्र पाटील (वय 50), शाहू विजय पाटील ( वय 10) यांचा मृत्यू झाला. तर विजय लोटन पाटील, रेखाबाई ज्ञानेश्वर पाटील, हिरकणबाई लोटन पाटील, मोनाली विजय पाटील, मोनाली विजय पाटील हे जखमी झाले.

या अपघाताची माहिती कळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात रवाना केले. या संदर्भात प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा 

The post धुळे-अमळनेर रस्त्यावरील अपघातात ३ जण ठार; ५ जण जखमी appeared first on पुढारी.