नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेतकर्यांसाठी एकाच छताखाली संशोधन, ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतकरी शेतीत मूलभूत क्रांती घडवून आणतात. जिल्ह्यातून 30 हजार कोटींची शेतीमाल निर्यात होत असून, हा या कृषी क्षेत्रातील क्रांतीचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. जिल्ह्यात शेतकरी एकत्रित येऊन प्रगती साधत आहेत. मी कृषिमंत्री असताना हा कृषी महोत्सव सुरू झाला याचे मला खूप समाधान आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि समर्थ गुरुपीठाद्वारे आयोजित कृषी महोत्सवाचे बुधवारी (दि.25) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प. पू. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आयोजक आबासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, आमदार अर्जुन खोतकर, सीमा हिरे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी बुधवारी सकाळी रामकुंड परिसरातून कृषी दिंडी काढण्यात आली होती. यामध्ये आदिवासी नृत्य, सेवामार्गाच्या विविध विभागांचे फलक हाती घेतलेले बालक, हाती भगवे ध्वज घेतलेल्या महिला व पुरुष, विविध वेशांतील बालक यांनी संपूर्ण मिरवणूक मार्गांवर मंगलमय, उत्साही वातावरण तयार केले होते. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी काही स्टॉल लागले होते, यामध्ये विविध कंपन्यांनी आपले साहित्य प्रदर्शनात मांडले होते. गुरुवारपासून नागरिकांना सलग सुट्टी येत असल्याने महोत्सवाला गर्दी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
- नाशिक : कडनोर, मुरकुटे यांना गुणवंत पोलिस पदक
- सोमालियात अमेरिकन सैन्याकडून ISIS चा म्होरक्या बिलालसह 10 दहशतवादी ठार ; बायडन प्रशासनाकडून पुष्टी
- नाशिक पदवीधर निवडणूक : शुभांगी पाटील यांच्यासाठी छगन भुजबळ उतरले मैदानात
The post कृषी महोत्सव : कृषी निर्यात म्हणजे कृषी क्रांतीचे उदाहरण - विखे-पाटील appeared first on पुढारी.