नाशिक : भगवान श्रीकृष्णाची शिकवण समाजाने अंगिकारण्याची गरज : छगन भुजबळ

येवला www.pudhari.news

येवला : पुढारी वृत्तसेवा

अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा श्रीकृष्णाने दिली आहे. भगवत गीतेत याबद्दल सर्व वर्णन करण्यात आले आहे. नाते बाजूला ठेऊन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कर्तव्याचे पालन करण्यासाठी त्यांनी अर्जुनासह पांडवांची साथ दिली. श्रीकृष्णाची हीच शिकवण व उपदेश समाजाने सद्य परिस्थितीत अंगिकारायला हवी. असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

अंदरसुल बनकर वस्ती येथे श्रीकृष्ण मंदिराचे लोकार्पण व कलशारोहण समारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजधरबाबा महानुभाव, कानळसकर बाबा, सुकेणकरबाबा भागवताचार्य, चिरडे बाबा, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, नंदलाल बनकर, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, आयोजक चंद्रकांत बनकर, आबासाहेब बनकर, तात्यासाहेब बनकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. छगन भुजबळ म्हणाले की, भगवान श्रीकष्णांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची जी शिकवण दिली. ती समाजातील सर्व घटकांनी अंगिकारावी लागेल तेव्हाच समाजव्यवस्था सुस्थितीत राहील. त्यासाठी तुम्हाला आम्हाला योग्य ठिकाणी अर्जुन बनण्याची गरज आहे. एकत्रित राहिलात तर अन्यायाविरुद्ध आपण लढा देऊ शकतो विखुरले गेलो तर अन्याय सहन करावा लागेल. त्यामुळे सर्वांनी एकत्रित राहून काम करावे लागेल असे त्यांनी सांगितले. तसेच अतिशय सुबक असे श्रीकृष्णाचे मंदिर तयार करण्यात आले असून याठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी लवकरच सभामंडप उभारण्यात येईल. आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे देखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : भगवान श्रीकृष्णाची शिकवण समाजाने अंगिकारण्याची गरज : छगन भुजबळ appeared first on पुढारी.