नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन

jalgaon

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तत्काळ दखल घेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव तालुक्यातील वडली येथे कृषी केंद्रास भेट देऊन रासायनिक खतांची विक्री बंदची नोटीस देऊन खताचे नमूने संकलित करण्याचे आदेश दिले व शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ नुकसानीचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. (Girish Mahajan)

Girish Mahajan  अहवाल सादर करण्याचे आदेश

कोणतीही कंपनी अथवा विक्रेता शेतकऱ्यांची फसवणूक करताना आढळल्यास अशा सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉल द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून अहवाल २४ तासात दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत‌.

अधिवेशनात कायदा होणार

शेतकऱ्यांची बोगस बियाणे व खतामुळे होत असलेल्या फसवणुकीची पोस्ट राज्य शासनाने गांभीर्याने घेतली आहे. या अनुषंगाने १६ जुलैच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानी संदर्भात विषय उपस्थित झाला. बोगस बियाणे व खत वाटप करणाऱ्या कंपन्याविरुद्ध कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असून याकरिता कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. अधिवेशनात हा कायदा मंजूर होणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी जगताप, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरविंद देशमुख, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा 

The post नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन appeared first on पुढारी.