जागतिक अन्न सुरक्षा दिन : सुरक्षित अन्न खाणे आपला हक्क

नाशिक : अंजली राऊत

सुरक्षित नसलेले अन्न हे जीवाला घातक ठरू शकते. विशेषतः लहान मुलांनी विषबाधित अन्न खाल्ले तर ते अधिकच घातक ठरते. त्यामुळे सुरक्षित अन्न खाणे हा आपला हक्क असून प्रत्येकाने याबाबत सजक राहण्याची गरज जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आहारतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी अन्न सुरक्षेचे महत्त्व आणि सर्वांसाठी अन्न सुरक्षेसाठी आपल्यापैकी प्रत्येक जण तयार असणे गरजेचे आहे. सुरक्षित अन्नासाठी शासकीय योजनेतील विविध स्तरांपासून तर अन्न उत्पादन करणारा बळीराजापर्यंत तसेच अन्न उत्पादकांपासून तर अन्न वितरक आणि हातगाडी अशा फेरीवाल्यांपर्यंत प्रत्येकाची अन्न सुरक्षिततेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यावर एकच उपाय आहे की, अन्नाला खराब करणाऱ्या विविध संभाव्य धोक्यांपासून अन्नाचे पूर्णपणे रक्षण करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला त्याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

खराब अन्नाबाबत संभाव्य धोके आणि विविध आजार टाळण्यासाठी अन्न सुरक्षा उपायांची आवश्यकता याविषयी जागरुकता निर्माण करणे हे जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे उद्दिष्ट आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार धावपळीच्या जीवनशैलीमुळे मिळेल त्या ठिकाणी मिळेल तसे अन्नसेवन करण्याची सवय घातक ठरू शकते. सुरक्षित अन्नाचा अभाव, गरिबी आणि अन्न मिळवण्यासाठी असणारा संघर्ष या सर्वासाठी अन्न सुरक्षा करण्यासाठी येणाऱ्या आव्हानांवर चिंतन करण्याची ही वेळ आहे. अन्न सुरक्षा हा प्रत्येक मानवाचा हक्क असून, प्रत्येकाला सुरक्षित आणि पौष्टिक अन्न खाण्याचा अधिकार आहे.

सुरक्षित अन्नाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो आहे. अन्न सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी विविध प्रकारचे अन्न तपासले जाते आणि त्यांचे विश्लेषण केले जाते. जागतिक अन्न सुरक्षा दिन अत्र सुरक्षाबाबत जागरुकता आणणे आणि विषबाधित अन्नसेवन केल्याने होणाऱ्या आजारांपासून स्वतः सोबत आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी खबरदारी घेणे तसेच इतरांनाही प्रोत्साहित करण्यासाठी या दिनाचे महत्त्व अधोरेखित करत आहे.

जागतिक अन्न सुरक्षा दिनाचा इतिहास

 युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने २० डिसेंबर २०१८ रोजी ७ जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून घोषित करण्यात यावा. यासाठी सुरक्षित अन्नाचे भरपूर फायदे अधोरेखित करण्यासाठी एक ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी, जागतिक आरोग्य असेंब्लीने अन्न सुरक्षा समस्या आणि जगातील आवश्यक कृतींबद्दल एक ठराव मंजूर केला. स्थानिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर अन्नजन्य रोगांना प्रतिबंध करणे आणि अन्न सुरक्षेसाठी जागतिक प्रयत्नांना बळ देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • जागतिक अन्न सुरक्षा दिनाचे महत्त्व संयुक्त राष्ट्रांनी अन्न सुरक्षेसाठी जागतिक स्तरावरील प्रयत्नांना मजबूत करणे हे जागतिक अन्न सुरक्षा दिना (वर्ल्ड फूड सेफ्टी डे) चे उद्दिष्ट आहे.

अन्न सुरक्षा कायदा इतर प्रगत देशापेक्षा भारतात २०१३ मध्ये लागू झाला असला तरी सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे. अन्नसुरक्षा जनजागृती व्हायलाच पाहिजे. अन्नाची गुणवत्ता चांगली पाहिजे तरच ते अन्न सुरक्षित आहे असे म्हणता येईल. तळागाळातील प्रत्येकाला सुरक्षित अन्न मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे. दूषित व भेसळयुक्त अन्नाबाबत सजग असणे गरजेचे आहे. – संगीता पत्की, आहारतज्ज्ञ, नाशिक.

फास्ट फूडचे प्रमाण कमी करायला हवे. त्यामुळे तणावमुक्त राहता येईल. सकाळचा नाश्ता हा राजाप्रमाणे हवा. दुपारचे जेवण मध्यमवर्गीय आणि रात्रीचे जेवण गरिबासारखे पाहिजे अशी आपली दिनचर्या ठेवली तर आपण स्वस्थ व सुरक्षित राहतो. ज्यूस पिण्याऐवजी जास्तीत जास्त फळे खाणे फायदेशीर आहे. ही तुमची रोजची दीनचर्या बनवा. पार्सल फूड हे प्रिझर्व्ह केलेले असते त्यामुळे ते थंड झाल्यानंतर पुन्हा गरम करून खाल्ले तर असे अन्नसेवन घातक असते. मद्यसेवन, धूम्रपान, तंबाखूसेवन करू नये. याबाबत देखील जागरुक असणे आवश्यक आहे. बाहेरून आणलेल्या भाज्या, फळे हे मिठाच्या पाण्यात अर्धा तास टाकून नंतर धुऊन खाल्ले तर ते आरोग्यासाठी चांगले आहे.

प्रियंका बेंडाळे, आहारतज्ज्ञ, नाशिक.

हेही वाचा –