जळगाव : पांढऱ्या सोन्याचे दर घसरले; बळीराजाची दिवाळीही कशीबशी साजरी

कापूस दरवाढ

 जळगाव : पुढारी वृत्तसेवा

खरिपातील सुमारे ६० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. त्यातील काही कापूस शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात विकून दिवाळसण साजरा केला. तर काही कापूस किमान १० हजारांचा दर मिळावा, यासाठी विक्रीस काढत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या खंडीचे (दोन गाठी) दर १ लाख १० हजारांवरून ६५ हजारांवर आले आहेत. त्यामुळे पांढऱ्या सोन्याचा ९ हजारांचा दर घसरून साडेसात ते आठ हजारांवर आला आहे.
गतवर्षी कपाशीला १३ हजारांपर्यंत भाव मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर कपाशीची पेरणी केली. त्यात परतीच्या पावसाने काही ठिकाणी कापसाचे मोठे नुकसान झाले, असे असले तरी कपाशीचे यंदा चांगले उत्पादन येत आहे. कापसाचा दर्जाही चांगला आहे. यामुळेच जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने यंदा २५ ते ३० लाख कापसाच्या गाठी निर्मितीचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. यामुळेच ३० लाख गाठींचे उत्पादन घेण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने कपाशीत आर्द्रता निर्माण झाल्याने कपाशीचे भाव कमी झाले आहेत. सध्या सात ते साडेआठ हजारांचा दर कपाशीला भाव मिळत  आहे.
आवक जास्त झाल्याने दरावर परिणाम…
गतवर्षी कापसाला मिळालेला १३ हजारांपर्यंतचा दरामुळे यंदा शेतकऱ्यांनी १० ते १५ टक्के पेरा अधिक केला. त्यामुळे कापसाचे उत्पादनात वाढ झाली आहे. कापसाला नऊ ते दहा हजारांच्या दराची अपेक्षा असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला सध्या मागणी कमी आहे. जर कापसाची आवक वाढली अन् आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी कमी राहिली तर सध्याच्या दरावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळेच खंडीचे दर १ लाख १० हजारांवरून ६५ हजारांवर आले आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : पांढऱ्या सोन्याचे दर घसरले; बळीराजाची दिवाळीही कशीबशी साजरी appeared first on पुढारी.