नाशिक : शहरातील नववसाहती झाल्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान

अटक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील नववसाहतीत तसेच औद्योगिक वसाहतींजवळ गुन्हेगारांच्या वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गंभीर गुन्हे करून गुन्हेगार स्वत:ची ओळख लपवून बिनदिक्कत वास्तव्य करत असल्याचे पोलिस कारवायांमधून समोर येत आहे. गावठी कट्टे, धारदार शस्त्रांसह या नववसाहतींमध्ये गुन्हेगारांचा वावर वाढल्याने त्याचा धोका सर्वसामान्यांना होण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखांच्या पथकांनी केलेल्या कारवायांमध्ये सराईत गुन्हेगार पकडले असून, त्यात शहरासह जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे.

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून मयूर रामदास गांगुर्डे (28, रा. दातीरनगर, अंबड लिंक रोड) याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याने हे पिस्तूल योगेश रघुनाथ मराठे (28, रा. जेलरोड) याच्याकडून खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्याचप्रमाणे या आधीही पोलिसांनी अंबड लिंक रोड, चुंचाळे, दत्तनगर, सातपूर, श्रमिकनगर आदी परिसरांमधून सराईत गुन्हेगारांना पकडले आहे. बहुतांश गुन्हेगार हे या परिसरांमध्ये भाडेतत्त्वाने राहात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना बिनदिक्कत भाडेतत्त्वाने घर मिळत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचप्रमाणे या परिसरांमध्ये गावठी कट्टे, धारदार शस्त्रे आढळत असल्याने, गुन्हेगारांकडून सर्रास वापर होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शस्त्रांचा वापर वाढल्याने ही शस्त्रे कोणामार्फत व कुठून पुरवली जातात याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मुंबई-पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये रोजगारासाठी परप्रांतीयांचे लोंढे नियमित येत आहेत. सातपूरचा श्रमिकनगर परिसर आणि अंबड लिंक रोडवरील दत्तनगर, चुंचाळे शिवार या परिसरात परप्रांतीय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून, कमी क्षेत्रफळात लोकसंख्येची घनता वाढली आहे. या आधी परप्रांतीयांनी अंबड लिंक रोडवरील भंगार बाजार वसविला होता. मात्र,तो काढण्यात आला. या भंगार बाजाराच्या आड परप्रांतीयांकडून गुन्हेगारी कारवाया करत असल्याचे आढळले होते. परप्रांतीय गुन्हेगार उत्तर प्रदेश, बिहारमधून गावठी कट्टे आणून नाशिकमध्ये विक्री करत असल्याचे चित्र आहे. येथे राहणार्‍या परप्रांतीयांकडे सहज आश्रय मिळत असल्याने परराज्यातील सराईत गुन्हेगार येथे वास्तव्यास येत असल्याचेही अनेक गुन्ह्यांवरून उघडकीस आले आहे. गुन्हेगारी कृत्य करून हे गुन्हेगार पसार होतात. त्यामुळे हे परिसर शहरातील सर्वाधिक संवेदनशील झाले असून, तेथे नियमित तपासणी व भाडेकरूंची माहिती संकलित करण्याची मागणी केली जात आहे.

अनोळखी व्यक्तींचा वावर शहरासाठी धोकादायक
या आधीही दहशतवादी बिलाल शेखला सातपूर परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर अनोळखी व्यक्तींचा वावर शहरासाठी धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भाडेतत्त्वाने राहणार्‍या तसेच हॉटेल, लॉजमध्ये राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, याकडेही कालांतराने दुर्लक्ष झाले असून, भाडेतत्त्वाने राहणार्‍यांची नोंद घरमालकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे होत आहे. त्यामुळे बहुतांश भाडेकरूंची माहिती अद्यापही पोलिसांपर्यंत आली नसल्याची धक्कादायक बाब आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : शहरातील नववसाहती झाल्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान appeared first on पुढारी.