शेतकरीविरोधी भाजपला बाजूला ठेवा : शरद पवार 

शरद पवार,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांचा निर्यातीऐवजी आयातीच्या धोरणाला पाठिंबा अधिक दिसतो, त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत येत असून शेतकरीविरोधी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला बाजूला ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले.

देवरगाव येथे रविवारी (दि. ९) शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारत बांधकाम भूमिपूजन सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार देवीदास पिंगळे, मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे, मविप्र अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, माजी खासदार समीर भुजबळ, सचिन पिंगळे, नाना महाले, प्रेरणा बलकवडे, विष्णुपंत म्हैसधुणे, नाशिकरोड-देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, संजय तुंगार, जगदीश पवार, गणेश गायधनी आदी उपस्थित होते.
आमदार छगन भुजबळ यांनी, आदिवासी समाजाकडे अधिक लक्ष द्यायला हवे, स्वातंत्र्य मिळविण्यात त्यांचेदेखील योगदान आहे. तसे झाले तर आदिवासी समाज इतरांच्या बरोबरीत येऊन प्रगती साधू शकतो, असे म्हटले.

नरहरी झिरवाळ म्हणाले, शरद पवार यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. तसेच बजेटच्या नऊ टक्के निधी आदिवासी विकासासाठी राखून ठेवला, त्यामुळे महाराष्ट्रात आज सुमारे 550 आश्रमशाळा निर्माण झाल्याचे दिसते. आदिवासी समाजाचे अधिकारी आज तुम्हाला मंत्रालय तसेच विविध शासकीय, निमशासकीय विभागांत काम करताना दिसतात. त्यामागे शरद पवार यांचे दूरदृष्टीचे धोरण कारणीभूत ठरले असे झिरवाळ यांनी सांगितले.
प्रास्ताविकात आमदार सरोज अहिरे म्हणाल्या की, अडीच वर्षांत तुम्ही निर्माण केलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी विविध विकास योजनांसाठी अजित पवार यांनी मंजूर करून दिला, त्यात देवरगावच्या आश्रमशाळेच्या इमारत बांधकामाचा १९ कोटींच्या निधीचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बालाजी देवस्थान, नाशिक सहकारी साखर कारखाना या महत्त्वाच्या समस्या महाविकास आघाडीच्या काळात कायमच्या मार्गी लागलेल्या आहेत, एकलहरा औष्णिक वीज केंद्राचा प्रलंबित ६६० मेगाव्हॉट प्रकल्प सोडविण्यासाठी आपण मध्यस्थी करावी, असे आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी खासदार शरद पवार यांना करून मतदारसंघातील विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली. सीमा पेठेकर यांनी सूत्रसंचलन केले. कचरू पाटील तांभेरे यांनी आभार मानले.

भावनेचे राजकरण होतेय 
मिरवणुकीत वादविवाद निर्माण करून हिंदू – मुस्लीम तणाव निर्माण करून भावनेचे राजकरण केले जातेय, पण त्यामुळे विकास खुंटतोय, हे लक्षात ठेवायला हवे. अशी टीका भुजबळ यांनी भाजपवर केली

सर्व मार्केट कमिट्या ताब्यात घ्या 
आपली कामे करायची असतील, तर सर्व ठिकाणी आपली माणसे असायला हवीत, जिल्ह्यात होऊ घातलेल्या सर्व मार्केट कमिटी निवडणुकीत एकजूट दाखवा. सर्व ठिकाणी सत्ता मिळवत ताब्यात घ्या. पुढे विधानसभादेखील ताब्यात घेऊ, फक्त गटबाजी, हेवेदावे करू नका, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

हेही वाचा : 

The post शेतकरीविरोधी भाजपला बाजूला ठेवा : शरद पवार  appeared first on पुढारी.