जळगाव : भारत-बांगलादेश सीमेजवळ पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत असतांना भडगाव तालुक्यातील गुढे येथील सैन्य दलातील जवानाला वीरमरण आले आहे. राहुल श्रावण माळी (वय ३४) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. ही घटना भडगाव तालुक्यात कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.
भडगाव तालुक्यातील गुढे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान चिरंजीव राहुल श्रावण माळी हे सुमारे १४ वर्षापूर्वी देशसेवेसाठी सैन्य दलात दाखल झाले होते. कर्तव्यावर असताना त्यांना वीर मरण आले. ते भारत – बांगलादेश सीमेजवळ पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे नायक पदावर सेवा बजावत होते. जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून राहुल माळी यांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे कळवण्यात आले आहे. बराकपूरच्या आर्मी रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
गुढे येथे ही वार्ता कळताच राहुल यांचे बंधू अविनाश माळी हे कलकत्ता येथे रवाना झाले असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत त्यांचा मृतदेह गुढे येथे आणला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शिव (वय ४) व शंभू (दीड वर्ष), वडील, आई व दोन मोठे भाऊ, वहिनी, पुतणे असा परीवार आहे. ते प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे लहान बंधू होत.
हेही वाचा :
- लोणावळ्यातील दंगल नियंत्रण पथकाचे प्रात्यक्षिक वाहतूक समस्या सुटणार
- सातारा : पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या बोलेराचा अपघात; सात जण जखमी
- अहमदनगर : तीन कुटुंबांचे पुनर्वसन ! समाजकल्याणमधून तिघांना शासकीय नोकरी
The post Jalgaon : भडगाव तालुक्यातील जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीर मरण appeared first on पुढारी.