
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
एकीकडे कांद्याला भाव नाही आणि दुसरीकडे चाळीत साठविलेला कांद्याची प्रत खराब होत असल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या उत्पादकाला नाइलाजाने कांदा विक्रीसाठी आणावा लागत आहे. परिणामी, भाव नसतानाही कांदाविक्रीची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.
येथील मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्यास किमान ४०० कमाल १,२१६, तर सरासरी फक्त ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. नाशिक जिल्ह्याला ‘कांद्याचे आगार’ म्हणून ओळखले जाते. येथे कांद्याचे उत्पादन विपुल प्रमाणात होत आहे. परंतु हवामानातील बदलामुळे चालू वर्षी कांद्याने शेतकर्यांना अक्षरशः रडविले आहे. लाल तसेच उन्हाळ कांदा कवडीमोल भावाने विकावा लागला आहे. सद्यस्थितीत कांद्याला भाव नाही. त्यातच खराब हवामान व अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला बसल्याने कांदा चाळीतदेखील टिकणार नाही. खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या उन्हाळ कांद्यास किमान ४०० कमाल १२१६ तर सरासरी फक्त ८०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. आज ना उद्या भाव वाढेल या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा खराब होत आहे. यामुळे नाइलाजाने चाळीतील कांदा बाहेर काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकीकडे भाव नाही अन् दुसरीकडे चाळीतील कांदा खराब होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मिळणाऱ्या दरातून झालेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
नाफेडमार्फत उन्हाळ कांदा खरेदी लवकरच सुरू होईल. शेतकर्यांना चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील असून लवकरच योग्य भाव मिळेल तसेच नाफेडमार्फत कांद्याची खरेदी सुरू केली जाणार आहे. – डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
सरकारकडून मदतीची गरज
यापूर्वी अवकाळी पावसाने पीक उद्ध्वस्त केले आणि आता कमी दर मिळाल्याने अडचणी वाढल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन शेती केली आहे. आता खर्चही वसूल झाला नसल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने मदत करणे गरजेचे आहे.
कांद्याच्या मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांना खर्च काढणे कठीण झाले आहे. भावात अचानक घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. – निवृत्ती न्याहारकर, शेतकरी.
हेही वाचा:
- पुणे शहरातील उंचावरच्या दिव्यांना प्रकाशाचे वावडे!
- G20 Summit : भारताचे मोठे राजनैतिक यश; चीन पाकिस्तानला धुडकावत 17 देशांनी जम्मू काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारले
- Aditya Singh Rajput case : आदित्य सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी पोलिसांनी नोंदवला तिघांचा जबाब
The post नाशिक : कांद्याचा वांदा... शेतकरी हतबल; कांद्याची प्रतही बिघडली appeared first on पुढारी.