जळगाव : पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना काय मिळाले?

आदित्य ठाकरे www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगावातील शिवसेनेचे आमदार पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात सहभागी झाले. जे गद्दार तिकडे गेले त्यांना सांगितले होते की तुम्हाला मंत्री करू, त्यांनाही वाटले चांगली खाती मिळतील. त्यांना काय मिळाले? असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावला.

युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शनिवारी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पोहोचली. या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आदित्य ठाकरे यांना औक्षण करत हातावर राखी बांधली. यावेळी व्यासपीठावर नरेंदसिंग सूर्यवंशी, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, युवासेना सचिव सूरज चव्हाण, लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना महिला संघटिका जिल्हाप्रमुख अंजली नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाध्यक्ष रावेर दीपकसिंग राजपूत यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी ५० थरांची दहीहंडी फोडली… 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात म्हणाले की, ५० थरांची दहीहंडी फोडली. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, दहीहंडी कालच होऊन गेली आहे. कालच महाराष्ट्राच्या तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, त्यांनी पण ५० थर लावले होते. मात्र, त्यांनी ५० थरांची दहीहंडी फोडली की इतर काही घेतले. ५० खोके यांनी घेतले. मात्र, सामान्य जनतेला काय मिळाले, तर काहीच नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांनी आता या ठिकाणी यावे आणि ही गर्दी पाहावी की आजही किती लोक शिवसेनेसोबत आहेत. हे तुमचे प्रेम तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद घ्यायलाच मी आलो आहे, असेही ठाकरे म्हणाले.

३३ देशांनी गद्दारीची नोंद घेतली 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते, ३३ देशांनी आमच्या बंडाची नोंद घेतली आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. ३३ देशांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राजीनामे देऊन निवडणुकांना सामोरे जा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.

भाजपवरही साधला निशाणा : 

कोविड काळात जनतेचे जीव वाचवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. जगानेही याचे कौतुक केले. पण, महाराष्ट्र पुढे गेला तर काय होईल, यामुळे त्यांच्या पोटात दुखत असेल. देशात आपले नाव होत होते, तेच त्यांच्या पोटात दुखत होते, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपवर टीका.

हेही वाचा:

The post जळगाव : पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना काय मिळाले? appeared first on पुढारी.