जळगाव : बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य चुकीचे – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

रामजन्मभूमीचे आंदोलन हा एक मोठा विचार होता. बाळासाहेब ठाकरे यांचे या आंदोलनाला समर्थन होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते असे म्हणणे चुकीचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांची ती व्यक्तिगत भूमिका आहे पक्षाची नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पक्ष संघटनात्मक दौर्‍यानिमित्त प्रदेशाध्यक्ष बावनकुळे जळगाव येथे आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले की, अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर व्हायला हवे, यासाठी देशभरातून कारसेवक आले होते. रामजन्मभूमीचे आंदोलन हा एक विचार होता, आंदोलन होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे या कारसेवकांच्या अयोध्येतील आंदोलनाला समर्थन होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसेना कार्यकर्ते तेथे नव्हते, असे म्हणणे योग्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांचीही त्यात मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची ती व्यक्तिगत भूमिका आहे, ती पक्षाची नाही. रामजन्मभूमीच्या आंदोलनात असलेले कारसेवक हे वेगवेगळ्या पक्षांचे आणि वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले होते. राम मंदिर व्हायला हवे, अशी कारसेवकांची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना कार्यकर्त्यांचा एकच विचार होता, तो म्हणजे प्रभू रामचंद्रांचे मंदिर निर्माण होण्याचा, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य खोडून काढले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली, तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद व दुर्गा वाहिनीचे होते, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका मांडली.

हेही वाचा:

The post जळगाव : बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य चुकीचे - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.