नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवळाली गावात सार्वजनिक पारावर गुरुवारी (दि. १९) झालेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत ठाकरे व शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाला होता. या वादात गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान भैया मणियार, प्रशांत जाधव, सागर कोकणे यांच्याविरोधात घटनेच्या तीन दिवसांनी खोटा गुन्हा दाखल केला असून, पालकमंत्र्यांच्या दबावातून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे हा गुन्हे मागे घेऊन तटस्थपणे गुन्ह्याचा तपास करण्याची मागणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासदंर्भात ठाकरे गटाने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गुरुवारी रात्री देवळाली गाव येथील सार्वजनिक पारावर सर्वपक्षीय शिवजयंती समितीच्या बैठकीत माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्याकडे मागील वर्षाचा हिशेब मागितल्याच्या रागातून लवटे यांनी माजी नगरसेवक भैया मणियार व त्यांच्या कार्यकर्त्यांशी वाद घातला. यावेळी संशयित स्वप्निल लवटे याने गोळीबार करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी स्वप्निल लवटेविराेधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आहे. असे असतानाही या घटनेच्या तीन दिवसांनी पोलिसांनी भय्या मणियार, प्रशांत जाधव, सागर कोकणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे हे कृत्य निषेधार्ह असून, केवळ पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा संशय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांनी सखोल चौकशी करावी आणि मणियार जाधव, कोकणे यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
हेही वाचा :
The post नाशिकचं गोळीबार प्रकरण : गुन्हा मागे घेण्याची ठाकरे गटाची मागणी appeared first on पुढारी.