नाशिक : उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ ‘सुप्रमा’

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमास राज्यमंत्री मंडळांकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे तसेच मांजरपाडासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण, कॉक्रीटीकरण व ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ सुप्रमा मिळावी यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ गेली अनेक दिवस पाठपुरावा करत होते. याबाबत त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात नियम १०५ अन्वये लक्षवेधी सुचनेद्वारे या विषयावर विधानसभेत चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरात या प्रकल्पाला सुप्रमा दिली जाईल असे आश्वासन दिले होते. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन पाळल्यामुळे छगन भुजबळ यांनी त्यांचे आभार मानले आहे.

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या मांजरपाडा (देवसाने) या राज्यासाठी पथदर्शी असलेल्या योजनेसह इतर सर्व प्रवाही वळण योजना, पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी- डोंगरगाव कालवा, ओझरखेड डावा कालव्याचा समावेश उर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये (UGP) होतो. या उर्ध्व गोदावरी प्रकल्पामधील मांजरपाडा सह काही वळण योजना आणि कालव्यांची कामे निधी अभावी अपूर्ण अवस्थेत आहेत. या उर्ध्व गोदावरी प्रकल्प अहवालास चतुर्थ सुप्रमा मिळावी यासाठी भुजबळांचे प्रयत्न होते. जयंत पाटील जलसंपदा मंत्री असतांना यासाठी त्यांनी मंत्रालयात बैठक सुद्धा घेतली होती..त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या चतुर्थ अहवालाला सुप्रमा प्रदान करण्यात आलेली आहे.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचा प्रस्ताव मार्च २०२१ मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समिती (SLTAC) कडून शासनास सादर झाला होता. या प्रस्तावावर दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या व्यय्य अग्रक्रम समिती बैठकीत चर्चा होऊन हा विषय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णयसुद्धा EPC च्या बैठकीत झालेला होता. ही फाईल कॅबिनेट मध्ये विषय घेण्यासाठी मुख्य सचिवांकडे गेली असतांना त्यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेण्यासाठी SLTAC च्या त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाने दि. ४ ऑगस्ट रोजी राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा क्लिअरन्स प्राप्त करून राज्य मंत्रीमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव सादर केलेला होता. त्यानंतर भुजबळ यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवला होता.

या प्रलंबित सुप्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा (देवसाने), धोंडाळपाडा, ननाशी, गोळशी महाजे यासह पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी- डोंगरगाव कालवा विस्तारीकरण व कॉक्रीटीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागण्यासाठी सदर प्रकल्पाला सुप्रमा मिळणे अत्यंत आवश्यक होती. या प्रकल्पांची अपुरी कामे पूर्ण झाल्यावर प्रामुख्याने दिंडोरी, निफाड, चांदवड आणि येवला या तालुक्यातील जलसिंचनाला फायदा होणार आहे.

येवलेकरांची होणार स्वप्नपूर्ती

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमास राज्य मंत्री मंडळांकडून मंजुरी मिळाल्याने मांजरपाडासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण, कॉक्रीटीकरण व ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे लागणार मार्गी लागणार आहे. त्यामुळे कालव्याच्या लिकेजचे प्रश्न मार्गी लागून पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचून येवलेकरांची स्वप्नपूर्ती होणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ 'सुप्रमा' appeared first on पुढारी.