नाशिक : मान्सूनचे दोन महिने संपले, 106 गावे वाड्या तहानलेलेच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मान्सूनचे दोन महिने संपुष्टात आले असताना जिल्ह्यात आजपर्यंत अपेक्षित पाऊस पडलेला नाही. परिणामी ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाकडून सात तालुक्यांतील एक लाख ३१ हजार ५२९ लोकसंख्येला आजही ५६ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जाताेय.

जुलै महिन्यात अर्धाधिक महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले असताना नाशिकवर मात्र त्याची अवकृपा झाली आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात वार्षिक सरासरीच्या केवळ ३५ टक्के पर्जन्य झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पुरेशा पावसाअभावी ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंतीची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना फिरावे लागत असल्याने त्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते आहे. ग्रामस्थांची हीच अडचण सोडविण्यासाठी प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरविले जात आहे. तब्बल ६७ गावे आणि ३९ वस्त्या अशा एकूण १०६ ठिकाणी पाणीपुरवठा केला जात आहे.

येवल्यात सर्वाधिक १६ टँकर सुरू आहेत. त्या खालोखाल मालेगावी १३ व चांदवडला १० टँकरने पाणीपुरवठा होत आहे. नांदगावला ८, देवळा ४, बागलाण ३ व सिन्नर दोन टॅंकरला धावताहेत. प्रशासनाने टँकरच्या दररोज १२३ फेऱ्या मंजूर केल्या असून, तेवढ्या फेऱ्या पूर्ण होत आहेत. दरम्यान, टॅंकरसोबतच प्रशासनाने ३८ विहिरी पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात गावांसाठी २५ व टँकरसाठीच्या १३ विहिरींचा समावेश आहे. आॅगस्टमध्ये पावसाने हुलकावणी दिल्यास जिल्ह्यावरील पाणी संकट अधिक गडद होऊ शकते.

टँकरची परिस्थिती

तालुका- संख्या

येवला १६

मालेगाव १३

चांदवड १०

नांदगाव ०८

देवळा ०४

बागलाण ०३

सिन्नर ०२

हेही वाचा :

The post नाशिक : मान्सूनचे दोन महिने संपले, 106 गावे वाड्या तहानलेलेच appeared first on पुढारी.