पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
समाजविघातक कुप्रथा समूळ नष्ट व्हाव्यात व सामाजिक सलोखा, समता यासाठी संविधानिक मूल्यांची जोपासना व्हावी याकरिता ही मूल्ये बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी. तरच भविष्यात वाईट कृत्यांना पायबंद बसेल या हेतूने जिल्हा परिषद शिक्षण विभाग धुळे यांच्या आदेशान्वये ग्रामीण भागात प्रबोधनासाठी बालविवाह निर्मूलन प्रबोधन फेरी काढण्यात आली.
फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मक नवरदेव-नवरी यांची वेशभूषा करून विविध घोषवाक्यांतून बालनाट्याद्वारे प्रबोधन केले. मुख्याध्यापक श्रीकांत अहिरे यांनी बालविवाह पद्धतीचे दुष्परिणाम सांगताना म्हटले की, अल्पवयीन विवाह हे सामाजिकदृष्ट्या चुकीचे आहेत. त्यामुळे आलेल्या वैधव्यामुळे मुलींचे भविष्य अंधारात जाते. त्यासाठी समाज सुशिक्षित होणे गरजेचे असून, शिक्षणाबद्दलची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. पिढी शिकली तर अशा प्रकारच्या प्रथांचे अनुकरण करणार नाही. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून, बालविवाह होत असतील, तर त्याची रीतसर तक्रार पोलिस प्रशासनाला देऊन गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. यावेळी शिक्षक अशोक चौधरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पवार, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
The post पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम appeared first on पुढारी.