पैशांऐवजी ‘त्यांना’ अन्न, पाणी द्या: नाशिकमध्ये आकारतेय नवी चळवळ

Beggar pudhari.news

सिडको/नाशिक: पुढारी वृत्तसेवा
लहान मुलांचे अपहरण रोखायचे असेल तर भिकाऱ्यांना रोख स्वरूपातील भीक देणे बंद करून त्यांना अन्न, पाणी देण्यासाठी संतोष गोवर्धने, नरेंद्र शेखावत, ईश्वर अहिरे आदी समाजसेवकांनी सुरू केली आहे.

नाशिकसह मुंबई-पुण्यामध्ये व सर्व महाराष्ट्रात ही वेगळी चळवळ वेग धरत आहे. कोणत्याही प्रकारच्या भिकाऱ्याला रोख स्वरूपातील भीक कोणीही देऊ नये, यासाठी या समाजसेवकांनी कॅशऐवजी अन्न-पाण्याची मदत अशी चळवळ सुरू केली आहे. कोणत्याही प्रकारची महिला, पुरुष, वृद्ध, अपंग, मुले, व्यक्ती भीक मागत असेल तर पैशांऐवजी त्यांना अन्न, पाणी द्या. आजपासून पैशांची भीक देणार नाही, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राष्ट्रीय, राज्यस्तरावरील भिकारी टोळ्यांच्या साखळ्या तुटण्यासाठी ही चळवळ सुरू झालेली आहे. भिकारी टोळ्या चौकात, बसस्थानकावर, रेल्वेस्थानकात तसेच प्रवासी गाड्यांत भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करतात. अपहरणाचे प्रकार रोखण्यासाठी अशा टोळ्यांचा अंत होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करा आणि एकही रुपया भिकाऱ्याला देऊ नका. खूप वाटले तर गाडीत दोन बिस्कीटचे पुडे ठेवा, पण पैसे देऊ नका. आमच्या या मोहिमेत सikहभागी होऊन कृती करा, असे आवाहन संतोष गोवर्धने, नरेंद्र शेखावत, ईश्वर अहिरे आदी समाजसेवकांनी केले आहे.

नाशिकमध्ये कोणत्याही चौकात सकाळी आणि दुपारी चारनंतर लहान मुलांना कडेवर घेऊन भिकारी महिला भीक वाढताना दिसत आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. बालकल्याण समिती, समाजकल्याण अधिकारी यांनाही हे प्रकार दिसतात. परंतु ते या प्रकरणात खोलवर जात विचारही करत नाही. त्यामुळे भिकारी टोळ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. नाशिकमधील या सामाजिक प्रश्नावर समाजशास्त्राच्या प्राध्यापकांनी संशोधन करणे अतिशय गरेजेचे आहे. परंतु उन्हातान्हात फिरून माहिती संकलन करणे त्यांना नकोसे वाटते आहे. याप्रकरणी कारवाईसाठी प्राध्यापक आणि अधिकारी थेट पोलिस खात्याकडे बोट दाखवतात, परंतु तेही योग्य नसल्याचे प्रांजळ मत या समाजसेवकांनी व्यक्त केले आहे.

नाशिकमध्ये भिकारी टोळ्यांची प्रमुख ठिकाणे
सीबीएस चौक, मुंबई नाका चौक, गडकरी चौक, मालेगाव स्टॅण्ड चौक, त्र्यंबक नाका चौक, ठक्कर बाजार चौक, त्र्यंबक रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभाग चौक, शरणपूर रोड चौक, सातपूर चौक, सिडकोतील विविध चौक, द्वारका चौक, बिटको चौक, जेलरोड चौक, हिरावाडी चौक ही नाशिकमध्ये भिकाऱ्यांची प्रमुख आश्रयस्थाने आहेत. या ठिकाणी किमान शंभर महिला आणि त्यांच्या कडेवरील बालके आणि लहान मुले असे किमान पाचशे ते सहाशे जण सकाळी आणि संध्याकाळी भीक मागताना दिसतात.

रात्री मुक्काम डोंगरे वसतिगृह मैदान
दिवसभर भीक मागून भिकारी महिला आणि त्यांची बालके रात्री डोंगरे वसतिगृह मैदानावर मुक्कामाला असतात. या मैदानासमोर असलेल्या हॉटेलमधून उरलेले अन्न आणून ते उदरभरण करतात. तेथूनच सकाळी नदीकिनारी जाऊन आंघोळ, स्वच्छता केल्यानंतर पुन्हा भीक मागणे, असा त्यांचा दिनक्रम आहे.

हेही वाचा:

The post पैशांऐवजी 'त्यांना' अन्न, पाणी द्या: नाशिकमध्ये आकारतेय नवी चळवळ appeared first on पुढारी.