ब्राह्मण समाजाचा भुजबळांना दहा दिवसांचा अल्टिमेटम

छगन भुजबळ ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दीड महिन्यात ना. छगन भुजबळ यांनी दोनदा ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक विधान केले आहे. त्यांचे हे विधान अज्ञानातून नसून, हेतुपुरस्सर आहे. अशात त्यांनी आठ ते दहा दिवसांत माफी मागावी अन्यथा वणवा पेटवू, असा इशारा ब्राह्मण समाजाने दिला आहे. यावेळी भुजबळांवर कायदेशीर कारवाईसह राज्यपालांची भेट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येऊन याविषयी स्पष्टीकरण द्यावे, असा सूरही निघाला. दरम्यान, यावेळी समाजबांधवांनी भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत गनिमी काव्याने पुतळ्याचे दहनही केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या कार्यालयात आयोजित निषेध सभेत ब्राह्मण समाजाने अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आनंद दवे, बाळासाहेब पाठक, महंत सुधीरदास पुजारी, महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेचे सतीश शुक्ल, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे मुकुंद कुलकर्णी, कुमार मुंगी, उत्तर भारतीय ब्राह्मण संघाचे द्वारकाप्रसाद तिवारी, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, ब्राह्मण महासंघाच्या शहराध्यक्षा निकिता पाठक, चाणक्य ब्राह्मण संघाच्या प्रदेश उपाध्यक्षा सुनीता मोकळ, बीबीएचे श्रीपाद कुलकर्णी, मनसेचे उपाध्यक्ष पराग शिंत्रे आदी उपस्थित होते.

सभेतील प्रस्ताव

भुजबळ नॉलेज सिटीचे नाव छत्रपती शिवाजी नॉलेज ठेवावे तसेच समीर आणि पंकज यांचे नाव शिवाजी आणि संभाजी ठेवावे, असे प्रस्ताव महंत सुधीरदास पुजारी यांनी मांडले. तसेच या बारशाला मी आणि अनिकेतशास्त्री हजर राहणार असल्याचेही ते म्हणाले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

संपूर्ण सभेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वर्दीत तसेच साध्या पोशाखात पोलिस सभास्थळी हजर होते. यावेळी प्रत्येक भाषणाचे चित्रीकरणही करण्यात आले.

हेही वाचा :

The post ब्राह्मण समाजाचा भुजबळांना दहा दिवसांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.